अ‍ॅड. हर्षल प्रधान, प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वंचित बहुजन आघाडीला मागील लोकसभा निवडणुकीत ४१ लाखांहून अधिक मते मिळाली. वंचितचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, मात्र या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. आताही भाजपकडून वंचितच्या भूमिकेचे समर्थन करण्यात येत आहे, त्यामागे २०१९ची पुनरावृत्ती हाच तर उद्देश नाही ना, असा प्रश्न उपस्थित करत ‘संगीत खंजीर कल्लोळ..’ या ‘पहिली बाजू’चा (लोकसत्ता- २ एप्रिल) प्रतिवाद करणारा लेख..

वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल भाजपला उमाळा येणे हे काहीसे अनाकलनीय आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करा; खोटे बोला आणि रेटून बोला आणि सतत बोलत राहा, हीच गोबेल्स नीती भाजप अवलंबताना दिसतो. भाजपकडून वंचितच्या भूमिकेचे समर्थन होणे आणि त्याबाबतीत भाजपने जाहीर भूमिका घेणे हे वंचितच्या कार्यकर्त्यांना अधिकच वंचितच राहावे लागणार, यावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे म्हणण्यास वाव आहे.

हेही वाचा >>>हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?

वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो’चा सूर आळवला आहे. महाराष्ट्रात वंचितचे असंख्य कार्यकर्ते आणि मतदार आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २४ मार्च २०१९ रोजी या पक्षाची स्थापना केली, मात्र केवळ निवडणुका लढविण्याव्यतिरिक्त वंचितचे फारसे योगदान राजकीय पटलावर दिसून आले नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांशी युती किंवा आघाडी करणे आणि निवडणुकांना सामोरे जाणे, हे या पक्षाचे धोरण आहे.

‘नातवां’ची युती राहून गेली..

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मध्यंतरी युती जाहीर केली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या काळात एकत्रितरीत्या जे काम केले, त्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असे वाटू लागले होते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनीही त्या इतिहासाची आठवण करून दिली होती. प्रबोधनकार आणि घटनाकार दोघेही समकालीन. या दोघांचा किमान तीसेक वर्षे तरी परस्परांशी संपर्क राहिला असावा. दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता. महात्मा जोतिबा फुलेंना दोघांनीही आपले गुरू मानले होते. राजर्षी शाहू महाराज हे दोघांच्याही पाठीशी आदरपूर्वक आणि ठामपणे उभे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते. प्रबोधनकार ठाकरे यांनाही ब्राह्मणेतर असल्यामुळे अनेक अडथळे ओलांडावे लागले. अर्थात त्याची तीव्रता डॉ. बाबासाहेबांइतकी निश्चितच नव्हती. जातिव्यवस्थेविरुद्ध दोघांनीही धडाडीने लढा दिला. दोघांचेही वाचन प्रचंड होते. इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा दोघांनीही सखोल अभ्यास केला होता. आपल्या या अभ्यासू वृत्तीच्या आणि व्यासंगाच्या आधारे आंबेडकर आणि प्रबोधनकार यांनी तत्कालीन ब्राह्मणी वर्चस्वाला हादरे दिले. बहुजनांनाही न्यूनगंडातून उभे करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. फक्त समाजसुधारक म्हणूनच नाही तर पत्रकार, लेखक आणि वक्ते म्हणून दोघांचाही महाराष्ट्रभर दरारा होता. दोघांचीही लेखणी तिखट होती.

हेही वाचा >>>निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास

प्रबोधनकारांनी डॉ. बाबासाहेबांविषयी अनेकदा अत्यंत आदरपूर्वक लेखन केले. डॉ. आंबेडकर यांनीही एक इतिहाससंशोधक म्हणून प्रबोधनकारांच्या लेखनाचे उतारे आपल्या साहित्यात उद्धृत केल्याचे आढळते. याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागली होती, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची ‘एकला चलो रे’ भूमिका जाहीर केली आणि आपले उमेदवार जाहीर करून ते कामाला लागले.

४१ लाख मते मिळूनही..

प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत, अभ्यासू आहेत, त्यांनी स्वतंत्र भूमिका घेण्याचे धोरण ठरवणे इथपर्यंत सगळे ठीकही होते असे म्हणूया हवे तर, पण आता अचानक भाजपच्या नेत्यांना त्यांच्याबद्दल उमाळा यावा आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कसा अन्याय केला वगैरे विधाने करावीत, हे काहीसे आश्चर्यकारकच. यात काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो.

२४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. प्रकाश आंबेडकर हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडीत सहभागी आहेत. या पक्षाने १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयए पक्षासह राज्यातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, त्यापैकी एका जागेवर एआयएमआयएमचा उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंचितचे उमेदवार होते. त्यापैकी एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार असलेले इम्तियाज जलील विजयी झाले, तर वंचितचे सर्व ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी मिळून ४१ लाख ३२ हजार २४२ म्हणजे एकूण ७.६४ टक्के मते मिळवली. साहजिकच यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या.

एखाद्या नवीन राजकीय पक्षाला पहिल्याच निवडणुकीत ७.६४ टक्के मतदान होते याचा अर्थ या पक्षाकडून मतदारांच्या अपेक्षा असतात. कार्यकर्तेदेखील पक्षाचा विस्तार होईल आणि आपल्याला समाजासाठी कार्य करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगून असतात. कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पक्षाने असे वंचित का ठेवले? याचे उत्तर काही सापडले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरही समाजाने अतोनात प्रेम केले. त्यांना आताच्या भाजपसारख्या एखाद्या सत्तापिपासू पक्षाकडून वापरले जाऊ नये, अशीच आंबेडकरप्रेमी जनतेची अपेक्षा आहे.

२०१९च्या निवडणुकीत राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते मिळविली. लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० ते १२ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी ५० हजारांहून अधिक मते मिळवली होती. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनाही अडीच लाखांहून अधिक मते मिळाली. उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या मतदारसंघांतही वंचित बहुजन आघाडीची कामगिरी चांगली होती. पण या मतांचा उपयोग विरोधकांना होण्याऐवजी भाजपला झाला आणि त्यांच्या विरोधातील मतांमध्ये फूट पडली. परिणामी भाजपचे

उमेदवार निवडून आले होते. सुशीलकुमार शिंदेंसारखे काँग्रेसचे दिग्गज नेते त्या निवडणुकीत पराभूत झाले तेही त्यामुळेच. याही निवडणुकीत वंचितने हाच डाव टाकला आहे की काय आणि म्हणूनच भाजपला त्यांचा एवढा उमाळा आला आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यास वाव आहे.

वंचितचा ‘मेगा प्लॅन’

या लोकसभा निवडणुकीसाठीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर मात करण्यासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. भाजपविरोधी सर्व संघटनांना एकत्र करून भाजपविरोधात नवीन आघाडी तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांचा हा मेगा प्लान वंचित बहुजन आघाडीला पुढे नेतो की पुन्हा एकदा भाजपच्या विजयास कारणीभूत ठरतो, हे जून महिन्यात कळेलच.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi lok sabha election vote split bjp amy
Show comments