-विजय देशमुख
दिल्लीच्या सत्ताकारणाचा मार्ग लोकसभेच्या ८०, विधानसभेच्या ४०३, राज्यसभेच्या ३१ आणि विधान परिषदेच्या १०० सदस्यांच्या व्यतिरिक्त १५ कोटी मतदारांसह विशाल पसरलेल्या उत्तर प्रदेशातूनच जातो. म्हणूनच राष्ट्रीय राजकारणात उत्तर प्रदेशचे कोणत्याही राज्यांपेक्षा अनन्यसाधारण महत्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाआधी हे महत्त्वाचे राज्य आपण खिशातच टाकले आहे अशा आविर्भावात असलेल्या भाजप नेत्यांच्या विश्वासाला लोकशाहीच्या जागरूक मतदारांनी सुरुंग लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राममंदिर प्रतिष्ठापनेनंतर मोदी लाटेच्या तथाकथित भ्रमाचा भोपळा फुटला तो अयोध्या नगरीत समाविष्ट होणाऱ्या फैजाबाद मतदारसंघात. दोन वेळा खासदार राहिलेल्या भाजपाच्या लल्लू सिंह यांचा मुकाबला नऊ वेळा आमदार राहिलेल्या मिल्कीपूरच्या अवधेश प्रसाद यांच्याशी होता. राम मंदिराच्या सगळ्या सोहळ्यात गाजावाजा झालेल्या भाजपाच्या माध्यमांपासून तसे अवधेश दुर्लक्षितच राहिले. लोकांना धर्माच्या नावावर गृहीत धरणाऱ्या आणि विजयाच्या भ्रमात सोहळ्यात गुंग झालेल्या भाजपा नेत्यांना त्यांच्यातच अडकवून अवधेश यांनी स्थानिक मुद्यांना हाथ घालत स्वतःचा विजय खेचून आणला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या, बिकापूर, मिल्किपूर, रुदौली, दरियाबाद हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. तसे अयोध्या-रुदौली बऱ्यापैकी शहरी विभागात येतात पण बाकी भाग ग्रामीण आहे.

आणखी वाचा-लोकांनी मोदींना इतर राजकारण्यांच्या पातळीवर आणून ठेवले आहे…

राममंदिर स्थापनेनंतर अयोध्येत विकास कामांनी वेग घेतला तेव्हा विमानतळ भूसंपादन, रामपथ, चौदा कोसी परिक्रमा मार्ग यात अंदाजे २२०० दुकाने, ८०० घरे आणि अनेक मंदिरे-मशिदी उद्ध्वस्त करण्यात आल्या. यावेळी पुनर्वसन आणि नुकसान भरपाईची रक्कम यासाठी मदत न करता आपले खासदार बाहेरील पर्यटक-भक्त यांच्या सेवेतील सुशोभीकरणामध्ये व्यग्र आहेत असा आक्षेप अनेकदा घेतला गेला. विकास की अतिशयोक्ती, विकास का डर हे दोन मुद्दे वारंवार लोकांकडून पुढे आले. योग्य प्रमाणात न मिळालेला मोबदला, न झालेले पुनर्वसन यामुळे स्थानिक लोकांच्या मनात असुक्षिततेने चांगलेच बाळसे धरले. अयोध्येचा भाग सोडला तर ग्रामीण भागात अजूनही त्या प्रमाणात विकास पोहोचलेला नाही. आवास योजना, शौचालय, पाणीप्रश्न, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न ग्रामीण लोकांसाठी अजूनही त्रासदायक आहेत. या सर्व प्रश्नांना कंटाळलेल्या जनतेची परिस्थिती ओळखून सपाने फैजाबादसाठी अवधेश यांच्या रूपाने चांगला जनसंपर्क असलेला दलित चेहरा दिला.

या वेळची उत्तरप्रदेशाची लोकसभा निवडणूक धार्मिक मुद्यांवर न होता जातीय समीकरणांवर झाली. मागील विधानसभा निवडणुकीत आलेल्या पराजयापासून धडा घेत अखिलेश यांनी मुस्लिम यादव यांच्यासह ओबीसी दलित मतांची मोट बांधली. लल्लू सिंह हे ठाकूर उच्चवर्णीय समाजातील असून अवधेश हे पासी या मागासवर्गीय जातीचे आहेत. राममंदिर म्हणजे हिंदुत्व आणि राममंदिराचे निर्माते म्हणजे मोदी म्हणून जनेतचा कौल हे आपल्याच पारड्यात पडेल या भ्रमात राहिलेल्या भाजपाने स्थानिक, मागासवर्गीय, लोकप्रिय उमेदवार निवडण्याचे आणि जातीय समीकरणे जुळवण्याचे सपाचे धोरण समजलेच नाही. एकीकडे भाजप नेते धार्मिक पर्यटनात अडकले होते. माध्यमांसमोर जाऊन अयोध्येत राम मंदिर बांधल्याचा गवगवा करत होते. तर दुसरीकडे अखिलेश यांनी माध्यमांपासून दूर राहण्याचे धोरण ठेवले होते. त्यांनी स्थानिक मुद्यांना हात घालत जातीय समीकरणांची बेरीज केली. भाजपाने प्रचारात वापरलेल्या ‘संविधान बदलू’ या विधानामुळे अस्वस्थ झालेल्या मागासवर्गीय जनतेला आश्वासन देत अखिलेश यांनी दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतांसाठी जोरदार प्रचार केला आणि तो यशस्वी झाला.

आणखी वाचा-आणखी वाचा-अंधभक्तीचा उन्माद महायुतीच्या अंगलट!

दुसरीकडे राजीव गांधी यांचे सहकारी राहिलेले, पडद्यामागचे कलाकार म्हणून ओळख असलेले किशोरीलाल शर्मा राहुल गांधीचे व्यवस्थापन करायला आले होते. पण नंतर त्यांनी स्वतःच निवडणूक लढवत स्मृती इराणी यांचा दीड लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

आमच्या माथ्यावरचा सत्तासूर्य जणू कधी मावळणारच नाही असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या प्रत्येक धनाढ्याला लोकशाहीने आजवर त्याची जागा दाखवली आहे आणि यापुढे सुद्धा दाखवत राहील यात दुमत नाही. या निवडणुकीत मतदारांनी घडवून आणलेला बदल भारतीय लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा आहे. येणाऱ्या काळात ‘मिली जुली’ सरकार स्थापन करण्यात करावी लागणारी तारेवरची कसरत पाहण्याची उत्सुकता असेल.

vijaydshmkh099@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly happened in ayodhya lok sabha election 2024 mrj
Show comments