-अक्षय अरुण शेळके
बेरोजगारी हा अलीकडच्या काळातील कळीचा मुद्दा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातही या प्रश्नाने विक्राळ रूप धारण केले आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०१९ साली मेगाभरती जाहीर केली आणि त्यासाठीच्या परीक्षा २०२३- २४ मध्ये झाल्या. ज्या दिवसापासून परीक्षा सुरू झाल्या त्या दिवसापासून पेपरफुटीच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारने किती तत्परतेने पावले उचलली आणि सरकारला तरुणांबद्दल किती काळजी आहे याचे हे एक मासलेवाईक उदाहरण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२३- २४ मध्ये, पेपरफुटीच्या आणि परीक्षांतील गैरप्रकारांच्या मालिकेने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला आहे. प्रश्नपत्रिका फोडाफोडीचा हा काळाबाजार दहावी, बारावी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा, पीएच. डी. शिष्यवृत्ती परीक्षांपासून ते सरकारी पदांसाठीच्या भरती परीक्षांपर्यंत पसरला आहे. २०२३- २४ मध्ये कोणकोणते पेपर फुटले, कोणकोणत्या सरकारी परीक्षांमध्ये घोटाळे झाले याचा आढावा घेतल्यास एक लांबलचक जंत्री समोर येते…

दहावी परीक्षेतील पेपरफुटी

इयत्ता दहावीचा बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर २०२४ मध्ये यवतमाळ येथे पहिल्या १० मिनिटांत फुटला आणि समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

आणखी वाचा-यापुढल्या आर्थिक गतीसाठी स्त्रियांना ‘स्वतंत्र, बुद्धिमान, सक्षम प्रौढ व्यक्ती’ मानाच…

बारावी पेपरफुटी

२०२४ साली बारावी बोर्डाचे तीन पेपर फुटल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आल्या. परभणी येथे जीवशास्त्राचा पेपर फुटला, यवतमाळ येथे इंग्रजीचा, तर बुलडाणा येथे गणिताचा पेपर फुटल्याच्या बातम्या होत्या.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळा (नीट) – एनटीए कडून देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात येते, या परीक्षेचा निकाल ४ जून रोजी लागल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसला आणि देशात खळबळ उडाली. परीक्षर्थींन पैकी ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले. विशेष म्हणजे हरियाणातील एका केंद्रावरील आठ विद्यार्थ्यांना ७१८, तर सहा विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले. यामुळे विद्यार्थी आणि पालक तणावग्रस्त आहेत आणि ते केंद्राकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहेत.

महाज्योती पीएच. डी. पेपरफुटी

महाज्योती पीएच. डी. फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे पुण्यातील विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. इथेही विद्यार्थ्यांवर न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली. त्यांनी संशोधन करावे की परीक्षांतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन करावीत, हे सरकारने स्पष्ट करावे. राज्याचे उपमुख्यमंत्रीच जर ‘तसेही विद्यार्थी पीएच. डी. करून काय दिवे लावतात,’ असे विचारत असतील, तर वेगळी विद्यार्थी याहून वेगळी काय अपेक्षा बाळगणार?

आणखी वाचा-बौद्ध-दलित ‘शहाणे’ आहेतच, हे श्रेय प्रकाश आंबेडकरांनीही मान्य करावे!

राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजूसी-नेट)

एन.टी.ए.च्या वतीने १८ जून रोजी देशभरात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजूसी-नेट) आयोजित करण्यात आली, परंतु विद्यार्थी परीक्षा देऊन घरी पोहचतात न पोहचतात तोच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत सांगितले की परीक्षेतील अनियमिततेमुळे परीक्षा रद्द करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेचा गोंधळ सुरू असताना आणखी एक परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. या परीक्षेला जवळपास १० लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षांच्या तयारीसाठी ज्या शिकवण्या लावल्या जातात त्यांची फी लाखांच्या घरात असते. विद्यार्थी दिवस-रात्र एक करून अभ्यास करतात. भविष्याची स्वप्ने त्या परीक्षांवर अवलंबून असतात. पण परीक्षेत घोळ होतात आणि एवढ्या मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. वेळेचा अपव्यय होतो, नैराश्य येते. या साऱ्याची जबाबदारी सरकार घेणार का? विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला आहे किंवा होत आहे त्याची भरपाई सरकार कशी करणार?

तलाठी परीक्षा घोटाळा

महसूल विभागातीली तलाठी हे पद सरळसेवेने भरले जाते, मेगाभरती अंतर्गत चार हजार ४६६ जागांची जाहिरात सरकारने काढली आणि या परीक्षेसाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले. मात्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि पोलीस विभागाने केलेल्या कारवाईत या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले. संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशा विविध केंद्रावर पेपर फुटल्याचे आरोप झाले आहेत. पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करू असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले परंतु ते आश्वासन लोकसभा निवडणुकीत कुठे गायब झाले ते कोणालाच समजले नाही.

आरोग्य भरती घोटाळा- आरोग्य विभागातील पदांसाठी ३१ ऑक्टोबर या दिवशी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटला. या प्रकरणात योग्यवेळी कारवाई होऊन पेपर फोडणाऱ्यांना अटक झाली परंतु प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? कारण त्यांच्या वाट्याच्या नोकऱ्या तर हे घोटाळेखोर अधिकारी आणि विद्यार्थी पळवत आहेत.

आणखी वाचा-ब्रिटनमधल्या निवडणुकांचा माहोल… लंडनमधून!

वनविभाग भरती घोटाळा

वनविभागात सरळसेवेने विविध पदांसाठी भरती करण्यात आली होती. यामध्ये वनरक्षकांच्या दोन हजार १३८ पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात आली, परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर एका तरुणाला उत्तरे पुरविली जात असल्याचे निष्पन्न झाले. परीक्षा केंद्रावर एकच आरोपी पकडला असला तरी राज्यभर अशा टोळ्या पसरल्या आहेत, असे आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केले आहेत.

जलसंपदा आणि बांधकाम विभाग भरती घोटाळा

मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण अधिकारी परीक्षा आयोजित करण्यात आली होती, परंतु या परीक्षेचा पेपर अमरावती येथील परीक्षा केंद्रावर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यावर कारवाई केली गेलेली नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता या पदासाठी घेण्यात आलेला पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे आणि या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

पंतप्रधान दरवर्षी परीक्षांच्या हंगामात ‘परीक्षा पे चर्चा’ करतात. त्यात ते देशातील शिक्षण क्षेत्राविषयी अतिशय अभिमानाने बोलताना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसतात. पण आज देशभरातील विद्यार्थी उद्विग्न झाले आहेत. असे असताना पंतप्रधान ‘पेपर लीक पे चर्चा’ कधी करणार? पेपर फुटीमध्ये जो- तो आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यापैकी कोणालाच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काही देणे-घेणे नाही.

akshay111shelake@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will prime minister narendra modi organize paper leak pe charcha mrj
First published on: 22-06-2024 at 08:59 IST