– श्रीकांत पवनीकर

‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’ने १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवसाच्या रूपाने आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पर्यटन म्हणजे केवळ फिरणे नसून हा एक अभ्यासही आहे. नायजेरियन नागरिक दिवंगत इग्नेशियस अमादुवा एटिग्बी यांनी सर्व प्रथम दरवर्षी २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना मांडली होती. त्यांनीच ‘ग्लोबल टुरिझम’चा पहिला ‘मास्टर प्लॅन’ तयार केला. १९७१ मध्ये इस्तंबूल, तुर्की येथे झालेल्या ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ ऑफिशियल ट्रॅव्हल ऑर्गनायझेशन’च्या कार्यकारी समितीच्या बैठकीला ‘नायजेरियन आणि आफ्रिकन शिष्टमंडळां’चे प्रमुख म्हणून एटिग्बी यांनी पर्यटन दिनाचा ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. तो सर्वसंमतीने पारित झाला आणि वार्षिक जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना ही आंतरराष्ट्रीय पर्यटनातील एटिग्बीच्या योगदानांपैकी एक आहे. पर्यटन दिवसाचे जनक म्हणून त्यांना ‘फादर ऑफ टुरिझम’ असेही संबोधण्यात येते. एटिग्बी यांचा मृत्यू २२ डिसेंबर १९९८ रोजी झाला.

दरवर्षी पर्यटन दिनी एक नवीन संकल्पना मांडली जाते. त्या अनुषंगाने सर्व संस्था आपापल्या पातळीवर कार्य करतात. २०२३ ची संकल्पना होती ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ आणि यंदाची संकल्पना आहे ‘शाश्वत प्रवास, कालातीत आठवणी’ अर्थात ‘सस्टेनेबल जर्नी, टाइमलेस मेमरीज’. पर्यटकांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणिव करून देणे आणि जागरुक पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे या संकल्पनेमागचे उद्दिष्ट आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकक्षेत्रात पर्यटकांचे स्थान आणि योगदान किती महत्त्वाचे असते, त्याचा स्थानिक समुदायाला कसा लाभ होतो, या विषयाचे या संकल्पनेतून प्रबोधन करण्यात येणार आहे.

हेही वाचा – नवीन शैक्षणिक धोरण उत्तम आहेच, पण व्यवहार्यतेचे काय?

विकासाला पूरक असलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्याच्या भरात पर्यटनाकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आज पर्यटन हा जगातील अनेक देशांच्या आणि भारतातील अनेक राज्यांच्या आर्थकारणातील महत्त्वाचा स्रोत आहे. समुद्राला लागून असलेले देश आणि अनेक राज्ये यांचा ८० टक्के विकास हा पर्यटनावर केंद्रित झाला आहे. पर्यटकांना अनेक प्रकारचे लाभ, सुविधा, सोयी, सवलती देण्यावर असंख्य कंपन्या आज भर देत आहेत. शिवाय मोबाइल फोन, व्हॉट्सॲप, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, दूरदर्शन, गुगल याचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे एकाच क्लिकवर सारे जग आज दिसत असले तरी जोपर्यंत आपण प्रत्यक्ष प्रवासाला आणि पर्यटनाला जात नाही, अनुभव घेत नाही, डोळ्यांनी निरीक्षण करत नाही तोपर्यंत पर्यटनाचा खरा आनंद आपल्याला घेता येणार नाही.

समाजमाध्यमे आपल्याला फक्त माहिती देतात, पण अनुभव देत नाहीत. सामाजिक, आर्थिक प्रभावासोबतच सांस्कृतिक, राजकीय व एकंदरीतच सार्वभौम उद्देश ठेऊनच याचा अभ्यास करण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने २७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय ‘शाश्वत प्रवास, कालातीत आठवणी’ या संकल्पनेद्वारे घेतला आहे. विविध देशांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि स्थानिक लोकांचा पर्यटकांशी संवाद घडवून तो वारसा समजून घेणे हा आजच्या ‘जागतिक पर्यटन दिनाचा’ प्रमुख उद्देश आहे. नवीन ठिकाणी गेल्यावर स्थानिक लोक पर्यटकांचे कसे स्वागत आणि आदरातिथ्य करतात आणि मानसन्मान देतात यातून त्या देशांची सकारात्मक प्रतिमा साकारत असते. यातूनच मग जंगल पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, क्रीडा पर्यटन, आरोग्य पर्यटन, विकासाकरता पर्यटन या संकल्पनांनी जन्म घेतला आणि प्रगतीचा मोठा टप्पा गाठला.

हेही वाचा – लेख: ही पूर्वनियोजित चकमक कोणाच्या सांगण्यावरून?

नवीन पर्यटन स्थळे पाहतानाच असे लक्षात येते की पर्यटनामुळे आज स्थानिक आणि गरीब लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात स्थानिक कलात्मक वस्तू, स्थानिक नावीन्यपूर्ण कपडे, रंगीबेरंगी टोप्या, नवनवीन खाद्य पदार्थ, समुद्र किनाऱ्यावरची बग्गी फेरी, क्रुझ फेरी, टॅक्सी इत्यादींमुळे स्थानिक रोजगारांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झालेली दिसते आणि आर्थिकदृष्ट्या ते सक्षम झालेले दिसतात. आता ‘गाईड’ हे नवीनच हमखास कमाई करण्याचे माध्यम तयार झालेले आहे. विदेशी भाषेचे हिंदी, इंग्रजीत जुजबी भाषांतर करून आणि थोडीफार विदेशी भाषा शिकून विदेशी पर्यटकांच्या शंकांचे ते उत्तमरितीने निरसन करू शकतात आणि त्याद्वारे अर्थार्जन करतात. फतेपूर सिक्री, जयपूर महाल, काझीरंगा, जैसलमेर, बिकानेर महाल, शिलाँग, दिसपूर, विजयनगर, गोवा, जोधपूर, मंगलोर, हम्पी, कुतुबमिनार, चारमिनार, आग्रा, मोढेरा सूर्यमंदिर अशा असंख्य ठिकाणी मी ही गाइडची भाषा, त्यांची मेहनत आणि बोलण्याची आकर्षक शैली अनुभवली आहे. हमखास कमाईचा हा उद्योग आज छान भरभराटीला आलेला आहे.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास पर्यटन क्षेत्राला चालना देण्याकरिता अनेक महत्वाचे उपक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहेत. यात रत्नागिरीपासून ठाणे, रायगडपर्यंत क्रूझ, जेट्टी पर्यटन सुरू झालेले आहे. कॅराव्हॅन धोरण, ‘माइस’ केंद्राची स्थापना, व्यवसाय सुलभता, गुंतवणूकदारांकरिता सुविधा कक्ष, आर्थिक प्रोत्साहन, पर्यटन केंद्रांना प्रोत्साहन, आदरातिथ्य प्रशिक्षण केंद्र, ‘युवा क्लब’, महिलां आणि दिव्यांगांना अतिरिक्त प्रोत्साहन, अनेक शुल्कांत सवलती, आयटी आणि डिजिटल प्रोत्साहन, रोजगारनिर्मिती अशी अनेक धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत. यात नवीन टुर ऑपेरटर, महिला, एजन्ट, आंतरराष्ट्रीय रुग्णांकरिता आरोग्य पर्यटन, पर्यटन प्रदर्शने, पर्यटन मेळावे यांचेसुद्धा भरपूर नियोजन केले आहे आणि या संदर्भात महाराष्ट्रात भरपूर गुंतवणूक करण्यात येत आहे.

पर्यटन आनंददायी असतेच, पण पर्यटन म्हणजे केवळ उपभोग नव्हे. पर्यटनाचा आनंद घेतानाच आपण स्वत: समृद्ध होऊ आणि जिथे जाऊ तेथील समृद्धी कायम राखू याची दक्षता घेणेही होय. हे लक्षात घेतल्याशिवाय पर्यटन सफल झाले, असे म्हणता येणार नाही.