डॉ. अपूर्वा पालकर (कुलगुरू, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ)
कौशल्य विद्यापीठांची संकल्पना अलीकडच्या काळातली आहे. नुकतेच काही राज्यांनी यांची स्थापना केली आहे. आजघडीला महाराष्ट्रात तसेच हरियाणा, दिल्ली, गुजरात, राजस्थान, आसाम सारख्या राज्यात ही विद्यापीठे आहेत. ‘कौशल्य प्रशिक्षणा’तील सुसूत्रतेसाठी यापूर्वी २००८ ला स्थापन झालेल्या राष्ट्रीय कौशल विकास महामंडळाच्या (नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एनएसडीसी) प्रमाणपत्र व अनेक योजनांद्वारे मनुष्यबळ विकसित केले जात होते; त्यासाठी सेक्टर स्किल कौन्सिल्सचीही स्थापना करण्यात आली, त्यात विविध प्रकारच्या उद्योग क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता; परंतु प्रमाणपत्र-अभ्यासक्रमच सुरू होते आणि त्यातील काही दूरशिक्षणाद्वारे सुरू होते. याच्या पुढले पाऊल म्हणजे, कौशल्यावर आधारित पदवी व पदव्युत्तर पदवीची संकल्पना! ही संकल्पना ‘कौशल्य विद्यापीठा’द्वारे राबवण्याचा उत्तम प्रयत्न केंद्र शासनाने केला आहे. अशा प्रकारच्या सर्व विद्यापीठांसाठी देशव्यापी एकरूप असा अभ्यासक्रम आराखडा (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) बनवला गेला असून कौशल्यावर आधारित व पारंपरिक विद्यापीठांद्वारे चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचे ‘क्रेडिट फ्रेमवर्क’ दिलेले आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’मध्येही कौशल्य विकासावर भर देण्यात आलेला आहेच.

‘कौशल्य विद्यापीठां’तून दिल्या जाणाऱ्या शिक्षणापैकी ४० टक्केच वर्गखोल्यांतले शिक्षण असावे आणि उर्वरित ६० टक्के वाटा हा प्रत्यक्ष कौशल्य-शिक्षणावरच आधारित असावा, अशी संकल्पना आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेले कौशल्य विद्यापीठ हे राज्यव्यापी विद्यापीठ असणे अपेक्षित आहे. अन्य राज्यांतही राज्य विधेयकांतून या विद्यापीठांची स्थापना झालेली आहे. यापैकी पहिल्या- हरियाणातील ‘विश्वकर्मा कौशल्य विश्वविद्यालया’ची स्थापना सन २०१६ मध्ये झाली. त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी (मागच्या वर्षी) इमारतीचे बांधकाम दुधोला पलवल येथे झाले. दि राजस्थान आयएलडी युनिव्हर्सिटी -२०१७ (दौलतपूर), मग २०२० मध्ये आसाम स्किल युनिव्हर्सिटी (प्रस्तावित आवार : मंगल्दाई, जिल्हा दार्रांग ) आणि दिल्ली स्किल्स युनिव्हर्सिटी, तर गुजरात स्किल युनिव्हर्सिटी (शिलाज, अहमदाबाद)ची स्थापना २०२१ मध्ये झाली आहे. ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठा’ची स्थापना २०२२ ची आहे (विधेयक २०२१ मधले, प्रस्तावित ठिकाण : पनवेल-नवी मुंबई). अनेक इतर राज्यांनी कौशल्य विद्यापीठांची घोषणा केलेली आहे.

हेही वाचा : सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग?

‘दिल्ली स्किल्स युनिव्हसिटी’ने ब्राउन फील्ड पद्धतीने, दिल्लीत असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतील डिप्लोमांचा समावेश विद्यापीठात करून घेतला. इथे तांत्रिक शिक्षणा बरोबरच इतर कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम देण्यात येत आहेत. असलेल्या मूलभूत सुविधांचा उपयोग करून या विद्यापीठांनी कार्याचा आरंभ केला आहे. राजस्थानच्या कौशल्य विद्यापीठाने महाविद्यालयांना संलग्नता दिली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने नवी मुंबई, पुणे व नागपूर येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू केले आहेत.

अभ्यासक्रम तयार करणे, प्रयोगशाळा, वर्ग खोल्या, प्राध्यापक नियुक्त्या, भौतिक सोयीसुविधा, परीक्षा विभाग, परीक्षा मंडळ, फी समिती, परिनियम, अभ्यास मंडळाची तसेच विद्यापरिषदेची स्थापना यांखेरीज कौशल्य विद्यापीठाला लागणारे उद्योग जगाशी निगडित ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ सुविहीतपणे होत राहील याची व्यवस्था व त्यासाठी नियामक मंडळाची स्थापना करणे हेही आवश्यक असते. अशा अनेक बाजू विठ्यापीठाच्या स्थापने पासून करणे आवश्यक होते. ‘ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट’ असलेल्या महाराष्ट्र, आसाम, हरियाणा, गुजरात इथल्या कौशल्य विद्यापीठांचा प्रभाव किमान पाच वर्षांत -म्हणजे एक चार वर्षाची बॅच बाहेर पडल्यावर- सगळ्या पर्यंत पोहोचेल.

हेही वाचा : कारभाऱ्यां’चे कारभार!

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात २१अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योग समूहांशी ५५ करार केले असून सर्व अभ्यासक्रमांत हे उद्योग समूह विद्यार्थ्यांना ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देणार आहेत. टाटा ट्रेंट, मॅकडोनाल्ड, मेट्रोपोलिस, केपीएमजी,पर्सिस्टन्ट सिस्टिम्स, वर्ल्ड ट्रेड सेन्टर यांसारख्या कंपन्यांचा /संस्थांचा समावेश आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात ‘डिझाइन थिंकिंग’वर भर देण्यात आला आहे. विद्यापीठांनी यावर्षी युरोपच्या ‘रुबिक’ या नामवंत डिझाइन संस्थेशी करार करून इंडस्ट्रिअल डिझाइन, इंटरॲक्शन डिझाइन अशा कौशल्यांवर आधारित पदवी अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्स साठी ‘एनएसडीसी- इंटरनॅशनल’शी करार केला असून जपानी, जर्मन या भाषांचे कौशल्य प्रशिक्षण येथे देण्यात येत आहे. प्रशिक्षित विद्यार्थ्यांना त्या देशांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य या केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. सध्या इथे १०० प्रशिक्षणार्थी भाषेचे कौशल्य प्राप्त करत आहेत. मेकॅट्रॉनिक्स, सिव्हिल ॲण्ड कन्स्ट्रक्शन मॅनॅजमेण्ट, कम्प्युटर टेकनॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांसारखे पदवी अभ्यासक्रम सुरू झालेले असून यात प्रायोगिक तत्त्वावर गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या वर्षी पूर्ण संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतील. ही सर्व कौशल्य विद्यापीठे ‘यूजीसी’च्या सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट’द्वारे विद्यार्थी निवडणार आहेतच; पण इतर राज्यव्यापी, शासकीय देशव्यापी प्रवेश परीक्षेचे स्कोअर असलेले विट्यार्थीसुद्धा इथे प्रवेश घेऊ शकतील.

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाने ‘आय-स्पार्क फाउंडेशन’ची स्थापना केली आहे व यात नवउद्यमांना प्रोत्साहन देणे, मेन्टॉरिंग करणे, बीजभांडवल देणे इत्यादी काम चालू आहे. महाराष्ट्रात हे काम विद्याविहार येथून सध्या सुरू असून काही नवसंशोधक करणारे इथे कार्यरत आहेत. विद्यापीठाने २० महाविद्यालयांत ‘प्री-इन्क्युबेशन सेंटर’ची स्थापना केली असून १०० नवसंशोधकांनी आपले प्रस्ताव विद्यापीठात सादर केले आहेत.

ठाण्यात ‘संत गाडगेबाबा स्वछता अकादमी’ची निर्मिती विद्यापीठाने केली असून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, फॅसिलिटी मॅनॅजमेण्ट व इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम ‘भारत विकास ग्रूप’ (बीव्हीजी) या कंपनीशी करार करून चालवण्यात येत आहेत. तीन महिन्यांत ३०० लाभार्थींनी याचा उपयोग केला असून त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. बिग डेटा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी वर आधारित ‘एम.टेक’ अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद आहे.

हेही वाचा : उथळ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश!

कौशल्य विद्यापीठ हे पारंपरिक विद्यापीठांना पूरक असून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचे ‘क्रेडिट’ अन्य प्रकारच्या विद्यापीठांतही ग्राह्य धरले जाऊ शकते. ‘रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग’ (आरपीएल- पारंपरिक वा अनौपचारिकपणे शिकलेल्या कौशल्यांचे प्रमाणीकरण) या क्षेत्रातही विद्यापीठाने उद्योगांच्या सहकार्याने क्षेत्रात काम चालू केलेले आहे.

ही सर्व कौशल्य विद्यापीठे पूर्णत: नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असून महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाने प्रोफेसर-ऑफ -प्रॅक्टिस नेमले आहेत. नुकताच विद्यापीठाचा आकृतीबंध राज्य शासनाने मान्य केला असून प्राध्यापकांच्या प्रत्यक्ष नेमणुकांचे कामही लवकरच सुरू होईल.

‘रोमची निर्मिती एका दिवसात झाली नव्हती’ या इंग्रजी म्हणीप्रमाणेच विद्यापीठाच्या उभारणीसाठीही काही वर्षे जावी लागतील. अलीकडेच स्थापन झालेल्या अनेक आयआयएम व आयआयटी यांच्या इमारती तयार होऊन कार्यान्वित होईपर्यंत त्यांना आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या अन्य मोठ्या आयआयएम व आयआयटीच्या छात्रछाये खाली ठेवता आले; ते कौशल्य विद्यापीठाबाबत करणे शक्य झाले नाही कारण ही संकल्पनाच नवीन आहे.

हेही वाचा : इराणमधील सुधारणावादी अध्यक्षांकडून अपेक्षा…

भारताने ही विद्यापीठे स्थापून कौशल्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, त्यामुळे आपली कौशल्य विद्यापीठे जगभर भारतीय मनुष्यबळ देण्यात सहभागी होतील. काळाच्या गरजेनुसार शिक्षणात बदल होणे अपेक्षित आहे. कौशल्य विद्यापीठ हे उपयोजित शिक्षणाच्या तत्त्वांनुसार (अप्लाइड युनिव्हर्सिटी) बदल घडवतील. आज ‘जागतिक युवा कौशल्य दिना’च्या निमित्ताने, असा संकल्प करू या की, या नावीन्यपूर्ण विद्यापीठाची संकल्पना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर यशस्वी होईल व भारत हा खऱ्या अर्थाने जगभर कौशल्यवंत मनुष्यबळ देईल!

((समाप्त))