चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी २०१३ रोजी होणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘साहित्य संमेलन हे राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही,’ असे पुण्यातील भाषणात म्हटल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने (१ जानेवारी) दिली आहे. आपले जीवनच राजकारणाने ग्रासलेले असल्याने साहित्य संमेलनासारख्या ठिकाणीही त्याचे प्रतिबिंब पडणारच, असे कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन होते. मात्र कोत्तापल्ले यांच्या ‘राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही’ या विधानामुळे राजकारण्यांना एक प्रकारे, साहित्य संमेलनाला उपस्थित राहून मिरवण्याचा हक्कच बहाल केल्यासारखे वाटू शकते.
साहित्य संमेलन हे राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही हे ठीक, पण त्यांना चार खडे बोल सुनावण्याचे ठिकाण ते नक्कीच आहे. राजकारण्यांनी संमेलनाच्या मांडवात फिरकूच नये असेही कुणी म्हणणार नाही.. परंतु राजकारणी राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा वापर जर साहित्य संमेलनाच्या मांडवातही स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी करू लागले तर तो दिवस दूर नाही जेव्हा संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक असण्याऐवजी एखादा राजकारणीच असेल आणि साहित्यिकांना फार तर ‘उपाध्यक्ष’ पद देऊन बोळवण केली जाईल!
तेव्हा संमेलनाध्यक्षांना विनंती आहे की, आपण आपल्या अध्यक्षीय भाषणात निदान सुनावण्याचे काम तरी कराल, अशी माफक अपेक्षा बाळगून आम्ही समस्त साहित्यरसिक आपल्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
– प्रा. दत्तात्रेय चितळे, ठाणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा