‘बँकेत एफडी, नकोच रे बाबा!’ हा लेख (अर्थवृत्तान्त, १६ नोव्हें.) वाचला. वाढती महागाई मुदत ठेवींवरील परतावा खाऊन टाकते हे मान्य. पण याचा अर्थ अशी गुंतवणूक नकोच असा होत नाही. आज गुंतवणुकीच्या तसेच बचतीच्या विविध साधनांचा विचार केला, तर मुदत ठेवींमधील गुंतवणूक केवळ स्थिर परतावा देणारी व सुरक्षितच नव्हे तर सर्वोच्च तरलता (लिक्विडिटी) असणारीही आहे. इतकी तरलता अन्य कोणत्याही साधनामध्ये नाही.
लेखकाने जी दोन उदाहरणे दिली आहेत, त्यातील पहिले म्हणजे कारचे. सुमारे तीन वर्षांनंतर कार विकत घ्यायची असेल, तर त्यासाठी सर्व रक्कम मुदत ठेवीत ठेवण्याऐवजी प्राधान्यक्रमाने येणाऱ्या इतर गोष्टींकडे ती वळवावी आणि तीन वर्षांनंतर कारचा अंदाजे भाव किती असू शकेल, याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे मासिक बचतीची सोय असलेले रिकिरग खाते उघडावे. आवश्यकता भासल्यास ही बचत मोडता येते किंवा त्यावर कर्जही घेता येते.
दुसरे उदाहरण दीर्घकालीन गुंतवणुकीचे. म्युच्युअल फंडाचा एसआयपी हा पर्याय नक्कीच चांगला आहे व मीही त्याचा उत्तम लाभ घेतला आहे. पण गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने केलेली गुंतवणूकसुद्धा निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारे उपयोगी पडते, हा माझा स्वानुभव आहे. एकच छोटेसे उदाहरण देतो. नोकरीत असताना मी व माझी पत्नी नियमितपणे पोस्टाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात दरमहा ठरावीक रक्कम गुंतवत होतो. मुदतपूर्तीनंतर मिळालेली रक्कम परत त्याच पद्धतीने गुंतवत होतो. अशा तऱ्हेने हे चक्र निवृत्तीपर्यंत सुरळीतपणे चालू राहिले.
आता निवृत्त झाल्यानंतर आम्ही ही रक्कम परत घ्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे दर महिन्याला एक ठरावीक उत्पन्न मिळू लागले आहे. त्यामुळे मुदत ठेव नकोच, असे म्हणण्यापेक्षा आपली जीवनशैली, आपले वय, या बाबी लक्षात घेऊन त्याप्रमाणे सरमिसळ गुंतवणूक करावी असे मला वाटते.
– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा