मुंबईतील नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचाराची बातमी (१९ सप्टें.) वाचली. त्याबद्दल घोटाळेबहाद्दरांचे अभिनंदन! कारण, आता इथल्या जनतेने या कोटय़वधी रुपयांच्या उधळपट्टीचे मोजमाप करणे केव्हाच सोडून दिले आहे. महाराष्ट्र सदन, सिंचन क्षेत्र, सहकारी बँका आणि कारखाने, पतसंस्था, आदिवासी योजना, शालेय पोषण आहार, टोलनाके, भूखंड, चिरेखाणी, वाळूउपसा, ऊर्जाक्षेत्र वगरे ते अगदी मंत्रालयातील छताच्या बांधकामापर्यंत भल्यामोठय़ा ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवण्यायोग्य यादीमध्ये अजून एकाची भर पडली, हा विकासही विरळाच! दोन-चार अभियंते-अधिकारी वगरे बळीचे बकरे बनवून निलंबित करायचे, समित्या नेमायच्या आणि एसीबी, सीबीआय वगरे मायंदाळ तसेच सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडील तपाससंस्थांत टोलवाटोलवी करत वेळकाढूपणा करायचा. जे कोणी चार-दोन अधिकारी तडफदार काम करत असतील त्यांच्या बदल्या करायच्या, वगरे प्रशासकीय खेळ सालाबादप्रमाणे चालूच राहील हे सुज्ञास सांगणे न लगे आणि इसवी सन ३५०० वगरे काळात या खटल्यांचा निकाल लागेल यात तिळमात्र शंका उरली नाहीये. मधील काळात च्यानेलीय चर्चातून (?) गल्ली-दिल्लीतील मातबर नेते-पत्रकार मंडळी पक्षीय शरसंधान करत ‘घोटाळ्यांची जबाबदारी कुणी घ्यायची?’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नावर हिरिरीने ‘पक्षीय भ्रष्टाचाराचा तुलनात्मक इतिहास’ खोदतील. ‘युरेका’ म्हणत या महाभागांना उत्तर सापडेपर्यंत त्या नाल्यांतून बरीच गटारगंगा वाहिली असेल आणि मुंबईकर नाकाला रुमाल लावत लोकलमधली कुबट-घामट धक्काबुक्की संपवत आपल्या प्राक्तनाला शिव्याशाप देत ‘मुंबई स्पिरिट’ नक्की जपतील. तसेच अधिक त्रास नको म्हणून फेसबुक, ट्विटर वगरे प्रगल्भ (?) समाजमाध्यमांवर बंदीची नौटंकी केली जाईल. या अवघड जागेच्या राजकीय दुखण्याबाबत बोलायचीही चोरी झालेय सर्वसामान्यांना.
दर दिवशी दुष्काळ, महागाई, पाणी-वीज कपात, कोलमडलेल्या सार्वजनिक व्यवस्था, वाहतुकीचे प्रश्न, बिल्डर लॉबी वगरे भयाण वास्तवाला तोंड देताना नक्की कोणत्या जात-धर्म-पंथ-भाषा वगरेचा झेंडा नागरिकांनी हाती घ्यावा हे सुज्ञ लोकांनी सांगावे. ज्या राजकीय व्यवस्थेत एकत्रीकरण-सुसूत्रीकरण होते त्याचाच जर असा खेळखंडोबा झाला असेल तर राज्यशकट हाकणार कसे? प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा बाबतीत लोकांना न्यायालयात धाव घ्यावी लागत असेल तर ते सरकारी बाबू-नेते मंडळींचे र्सवकष अपयश आहे. त्यात अमेरिकेत एखादा ८० टनी देवमासा कसा अंगावर पडला आणि बिबटय़ा-हत्ती कसा वस्तीत घुसला, ते अगदी एखादे हाय-प्रोफाइल हत्याकांड असो अथवा सामान्यांचे दैनंदिन जीवन हराम करणारे दुष्काळासारखे भयाण प्रश्न किंवा एखाद्या टिनपाट चित्रपट-मालिकेचा शुभारंभ सर्वच बातम्या या ‘ब्रेकिंग न्यूज’ असतात अशी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची वैचारिक धारणा आहे. त्यामुळे मार्गदर्शनासाठी ज्याच्याकडे पाहावे असा चेहरा सामाजिक विश्वात कुठे आहे? बरीचशी साहित्यिक-पत्रकार मंडळी आपापल्या निष्ठा आधीच राजकीय खुंटीला टांगून मोकळी झालेली आहेत. तेव्हा जनआंदोलन करायचे, टिळक-आगरकर-आंबेडकर अशी थोरामोठय़ांची नावे घेऊन हुंदके द्यायचे की पुन्हा मतदानाची वाट पाहात दिवस कंठत फेसबुकी दंगामस्ती करायची की राजकीय चच्रेची गुऱ्हाळं रंगवायची याचे उत्तर कोणी तरी द्यावेच?
– नीलेश तेंडुलकर, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा