‘दुग्रे.. दुर्घट भारी’ हा मार्मिक अग्रलेख (५ ऑगस्ट) वाचला. अधिकारपदावरील व्यक्ती अधिकाराचा योग्य वापर करते, तेव्हा तिला शाबासकी न मिळता निलंबनाच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागते, यासारखे दुर्भाग्य या देशाचे दुसरे नाही. जे काही मूठभर प्रामाणिक अधिकारी शिल्लक आहेत त्यांच्यासाठीसुद्धा ही एक प्रकारची नकारात्मक घटना आहे. ज्या वेळी वाळूमाफियांवर कार्यवाही चालू होती त्या वेळी दुर्गाशक्ती नागपाल यांना किती प्रलोभने आली असतील, त्या सगळ्यांवर मत करून त्यांनी नि:स्पृहपणे योग्य तो निर्णय घेतला. आता परिस्थिती अशी निर्माण होईल की प्रामाणिक राहून काय उपयोग, अशा प्रकारची मानसिकता जोर धरू लागेल. (आज आपण ब्रेन-ड्रेनच्या गोष्टी करतो; परंतु या देशामध्ये कर्तृत्वाला वाव नाही, हुशारीला किंमत शून्य, अशी भावनाही परदेशात स्थायिक होण्यामागे आहेच.)
फक्त स्वार्थ जेव्हा राज्यकर्त्यांचा विषय होतो तेव्हा त्या समाजाचा ऱ्हास होण्यास वेळ लागत नाही. राज्यकर्ते यवनी असोत की इंग्रज, त्यांनी चांगल्या अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीचा उपयोग केला, पण आपण मात्र स्वराज्य मिळवूनसुद्धा क्षुद्रच राहिलो.
मला तर वाटते की आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा कर्तव्यदक्ष दुर्गादेवींना आपल्या महाराष्ट्रात आमंत्रण द्यावे. आपल्याला अशाच लोकांची गरज आहे, नवनिर्माणासाठी!
देवेन्द्र एस. जैन,
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा