सांगली महापालिकेच्या निवडणुकीत बेजबाबदार विधाने करण्याची परमावधी गाठली गेली. राज्यपालांसमोर ज्यांनी घटनेच्या साक्षीने जबाबदारीने राज्यकारभार करावयाची शपथ घेतली आहे, त्यांनीच अशा प्रकारची बेलगाम वक्तव्ये करावी हे लांच्छनास्पद आहे. मांडी कापून घेणे, अंडीपिल्ली बाहेर काढणे – हा तर ट्रेलर झाला, खरा सिनेमा तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि त्या निकालावर पुढचा सीक्वेल विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रकाशित होईल.
शिवराळ भाषा एक वेळ बाजूला ठेवू. पण मंत्रिपदावरील जबाबदार व्यक्ती जेव्हा सहकारी मंत्र्यांबद्दल चेम्बूरची फाइल, महार वतनाची जमीन हडप करणे असे गर्हणीय आरोप करतात याचा अर्थ काय? खरेतर घडलेल्या गुन्ह्य़ांबद्दल असलेली माहिती दडवणे हादेखील कायद्याने गुन्हाच आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी सर्वाना माहीत असलेली माहिती फोडली म्हणून निवडणूक आयोगाची झोप उडाली. तेदेखील जाहीर सभेतील वक्तव्य होते. मग सांगली महापालिकेच्या निवडणुकीतील वक्तव्याची दखल कोणीच घेऊ शकत नाही का? विरोधी पक्षांच्या हातात इतके छान कोलीत मिळाले आहे, यावर याचिका सहज दखल करता येईल. पण ते तर अधिवेशनाअगोदर भ्रष्टाचारावर चर्चा करण्याची राणा भीमदेवी गर्जना करतात आणि अधिवेशनात तोंडात मिठाची गुळणी धरून बसतात, याला काही ‘अर्थ’ आहे का? आता फडणवीसांकडून थोडय़ाफार अपेक्षा करू या.
शेवटी काय, उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे. असे ‘दादा’ आणि ‘आबा’ आपले भावी मुख्यमंत्री असतील तर काकाच काय परमेश्वरदेखील महाराष्ट्राला वाचवू शकणार नाही.
-सुहास शिवलकर, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा