राज्यपाल हे पद घटनात्मक आहे, पण या पदावर होणारी नियुक्ती नेहमीच राजकीय राहिली आहे. अडगळीत पडलेल्या आपल्या ज्येष्ठ नेत्यांची सोय लावण्यासाठी या पदाचा उपयोग केला जातो. प्रसंगी, विरोधी पक्षाचे राज्यात असलेले सरकार पाडण्यासाठी या राजकीय राज्यपालांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आमच्याच राजकीय नेत्यांनी राज्यपाल पदाची अवहेलना केली आहे. आपल्या राजकीय फायद्या-तोटय़ासाठी घटनात्मक पदाला राजकीय नियुक्तीचे स्वरूप दिले. सर्वाधिक काळ सत्तेत राहिल्यामुळे काँग्रेस यासाठी अधिक जबाबदार आहे. २००४ साली काँग्रेसने सत्तेवर येताच एनडीए सरकारने नेमलेले राज्यपाल बदलले होते. त्यामुळे आता कुरकुर न करता काँग्रेसने नवीन सरकारला सहकार्य केले पाहिजे. तसेच यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘सरकार बदलले की सर्व राज्यपालांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे द्यावेत, म्हणजे नवीन सरकार आपल्या मर्जीप्रमाणे राज्यपाल नियुक्त करू शकेल’ अशी तरतूद करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याचा इतिहास असलेल्या आपल्या देशात राज्यपालांसंबंधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बदलणे काही अवघड नाही.
– हेमंत सदानंद पाटील, सांताक्रूज प. (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा