गम्झल आणि शेरो-शायरी हे जसं उर्दू साहित्याचं एक अंग आहे, तशीच व्यंगात्मक लेखनानंही ही भाषा समृद्ध आहे. उर्दूतील अव्वल दर्जाच्या व्यंगलेखकांपैकी एक असलेले मुज्मतबा हुसैन हे काळाच्या पडद्याआड गेले, तेव्हा उर्दू व्यंगलेखनाचा अखेरचा स्तंभ ढासळल्याची प्रतिक्रिया साहित्यक्षेत्रात व्यक्त झाली. ती किती समर्पक आहे हे मुज्मतबा यांचं लेखन वाचलेल्यांना पटेल. स्वत: विनोदाचं निराळं रसायन असलेल्या खुशवंत सिंगांसारख्या चतुरस्र लेखकानं त्यांचं वर्णन ‘रेअर ब्रीड अमंग दि इंडियन रायटर्स ऑफ ह्य़ुमर’ असं उगाच केलं नव्हतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्दू साहित्याशी परिचय नसलेल्या अनेकांना मुज्मतबा यांचं नाव परिचित झालं, ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी ‘पद्मश्री’ पुरस्कार परत केला तेव्हा. मुळात जे स्वत:साठी काही बोलू शकत नाहीत, अशा लोकांचा आवाज उठवताना सत्ताधाऱ्यांविरुद्ध ज्यांचा स्वर नेहमीच निर्भय राहिला, अशा हुसैन यांना हा पुरस्कार मिळणं हेच एक आश्चर्य. पण उर्दू साहित्यातील योगदानाबद्दल २००७ साली त्यांना तो मिळाला खरा. मात्र त्यांनी तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. त्यामुळेच सुधारित नागरिकत्व कायदा संमत झाल्याच्या निषेधार्थ पद्मश्री परत करताना त्यांना या पुरस्काराचा मोह बांधून ठेवू शकला नाही. ‘ज्या लोकशाहीसाठी मी लढलो, ती धोक्यात आली असताना मी सरकारसोबत जुळलेला असावा असे मला वाटत नाही’, असं ते त्यावेळी म्हणाले होते.

हुसैन यांचा जन्म उर्दूसाठी पोषक वातावरण असलेल्या हैदराबादेत १९३६ साली झाला. वयाच्या २४ व्या वर्षी लेखनप्रवास सुरू केलेल्या मुज्मतबा यांनी सुमारे ३० पुस्तकं लिहिली. एखाद्या गायकाच्या सुरांच्या लकेरीवर धुंद होण्याचा अनुभव जसा असतो, तसा त्यांच्या लेखनातील विनोद वाचकाला मुग्ध करून टाकी, तो वाचून संपेपर्यंत. समीक्षकांच्या भाषेत हे ‘धाराप्रवाही’ लेखन. कवितेचा ‘क’ही कळत नसलेले लोक इतरांची मदत घेऊन कवी कसे बनत आहेत याचं उपहासात्मक वर्णन असलेलं ‘गम्झल सप्लाइंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्च्युअरिंग कंपनी’ या लेखनाचं अफलातून शीर्षक मुज्मतबांसारख्या हाडाच्या उपरोधिक लेखकालाच सुचू शकलं असतं. ‘अपने याद में’ हे आत्मचरित्रपर लेखनही त्यांनी उपहासगर्भ शैलीतच केलं, हे उल्लेखनीय. ‘उर्दू के शहर, उर्दू के लोग’, ‘बहर हाल’, ‘सफर लख़्त’, ‘मेरा कॉलम’, ‘किस्सा-ए-मुख्म्तसर’ ही त्यांच्या काही उल्लेखनीय रचनांची नावं. त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद हिंदी व इंग्रजीसह इतर भाषांत झाले. काही देशांची प्रवासवर्णनंही त्यांनी लिहिली.

मुज्मतबा यांचा कल राजकीय होता आणि त्यांच्या लेखनातही त्याचं प्रतिबिंब उमटत असे. ते उघडपणे राजकीय विषयांवर मतप्रदर्शनही करीत. राजकीय विचारसरणी डावी असली, तरी टीका करताना ते धर्मनिरपेक्ष होते, असं म्हटलं जाई. त्यांच्या लेखनात कटुता नसायची.

भारतीय उपखंडातील लोकप्रिय लेखकांपैकी ते एक होते. त्यांची तुलना दोन वर्षांपूर्वी कालवश झालेले उर्दूतील महनीय व्यंग्यकार मुश्ताक अहमद युसुफी यांच्याशी केली जाई. मात्र जाणकारांच्या मते युसुफी यांची भाषा कळण्यास जराशी कठीण होती. तुलनेनं मुज्मतबा यांचं लेखन साधं-सोपं आणि मोजक्या शब्दांत हास्याची पखरण करणारं!  त्यांच्या निधनामुळे उर्दूतील व्यंगात्मक लेखनाचं एक पर्वच अस्तंगत झालं आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mujtaba hussain profile abn