राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृह खात्यावरील टीकेमुळे ते अस्वस्थ झाल्याची बातमी सर्वच वृत्तपत्रांत झळकली आणि अशा बातम्या प्रसारमाध्यमांना कोण पुरवते, याचीही चर्चा सुरू झाली. मात्र त्यामुळे गृहमंत्र्यांना पोलीस ठाण्यांच्या उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकारही नाहीत, ही बाब जनतेसमोर उघड झाली! वास्तविक ‘बदली’ ही शासकीय कर्मचाऱ्याला दिलेली शिक्षा नाही. दर तीन वर्षांनंतर बदली होणे हा नित्यक्रम असून तसा कायदा आहे. लोकसेवकाने (पब्लिक सर्व्हट) आपल्या कार्यक्षेत्रात हितसंबंध तयार करू नये म्हणून ही उपाययोजना आहे.
मात्र या खात्यावर वचक बसविण्यासाठी आबांनी ‘बदली’ अधिकाराचा ‘दंडुका’ आपल्या हाती देण्याची मागणी केली आहे. बदली अधिकाराव्यतिरिक्त बरेच काही अधिकार माननीय गृहमंत्र्यांना आहेतच. पोलिसांचे गैरवर्तन, गैरकृत्ये टाळण्यासाठी उपाययोजना, नियम, आदेश तयार करणे सहज शक्य आहे. उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे असा ‘वचक’ बसवल्याची उदाहरणे माननीय गृहमंत्र्यांना माहीतच असावीत. अशा परिस्थितीत केवळ बदली करण्याचा अधिकार आपणास नाही, अशी पळवाट या पदावरील व्यक्तीला शोभत नाही आणि जनतेलाही अशी सबब मान्य होणारी नाही.
अॅड. वि. दि. पाटकर, डोंबिवली (पूर्व)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा