क्रिकेटमध्ये अपयशाचे खापर संघनायकावर फोडणे ही परंपरा आहे. संघाची निवड समिती मात्र नामानिराळी राहते. निवड प्रक्रियेत संघनायकाचा सहभाग हा गुलदस्त्यात राहणारा विषय आहे. निवड समितीने दिलेल्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे व त्यासाठी डावपेच आखणे एवढेच तरी महत्त्वाचे काम संघनायक करू शकतो. खेळाडूंनी संघनायकाकडून प्रेरणा वगैरे घेणे/ देणे हा खेळाचा वैयक्तिक भाग झाला.
निवड समितीने आपली निवड क्रिकेट रसिकांसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे. संघ संतुलित ठेवणे व भविष्यातील संघासाठी तरुण रक्ताला वाव देणे हे उद्देश कितपत साध्य झाले हे सामान्य प्रेक्षकांना कळणे महत्त्वाचे आहे. इथे पारदर्शकता जरुरीची आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी ‘अनुभव नाही म्हणून निवड नाही आणि निवड नाही म्हणून अनुभव नाही’ हाच अनुभव वारंवार येताना दिसतो, त्याला यामुळे आळा बसू शकेल.
निवड समितीने प्रत्येक खेळाडूबाबतचे विश्लेषण जाहीर केल्यास, संघ जिंकला की त्याला डोक्यावर घेऊन नाचणे आणि हरला की पायदळी तुडवणे हा प्रकार बंद होऊ शकेल. खेळाकडे खेळ म्हणून पाहण्याची वृत्ती वाढीस लागेल. निवड समितीचा निर्णय जरी अंतिम असला तरी प्रेक्षकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. समंजसपणाच्या उंबरठय़ावर असलेल्या प्रेक्षकांना हा बदल सकारात्मक वाटेल, अशी आशा वाटते.
जयंत गुप्ते, लिंकिंग रोड, खार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा