हवेचे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्यांना वैफल्यग्रस्त करते, असे ओहियो स्टेट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो, असे तिथल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात, तिथल्या संशोधकांनी मेंदूतील हिप्पोकॅम्पस या स्मरणशक्ती, शिकणे, भावावस्था यांच्याशी निगडित असलेल्या भागाचा सखोल अभ्यास करून सदर निष्कर्ष काढला.माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे हवेचे प्रदूषण होत आहे आणि आपण स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत. कॅनडातील एका अर्थतज्ज्ञांच्या तुकडीने हवेतील प्रदूषण आणि लोकांचा आनंद यातील संबंध स्पष्ट करणारा दीर्घ आढावा घेतला आहे. त्यांनी ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ग्रीन इकॉनॉमिक्स’ या जागतिक नियतकालिकात आपला शोधनिबंध प्रकाशित करून वातावरणातले हवेचे प्रदूषण आणि नागरिकांची आनंदी वृत्ती यासंबंधी सविस्तर उहापोह केला आहे. हवेचे प्रदूषण वाढल्याने माणसे लवकर दु:खी होतात. इतकेच नाही तर ज्या देशातले नागरिक आनंदी नसतात, तिथे हे प्रदूषण अवाजवी आढळून आले आहे. हा प्रकल्प हाती घेताना त्यांनी १४ युरोपियन देशांची निवड केली होती. त्यांना या दोन घटकांमधला संबंध प्रस्थापित करायचा होता. त्यांनी बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आर्यलड, इटली, लुक्सेम्बर्ग, नेदरलँड, पोर्तुगील, रोमानिया, रशिया, स्पेन आणि इंग्लंड या देशातील हवाई प्रदूषणाची माहिती (डेटा) गोळा केली. त्या देशांतील इंधन ज्वलनातून होणारे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोजले आणि ‘ग्रॅन्गर कॅज्युएलिटी’ चाचणी वापरून नागरिकांच्या सौख्याचे मोजमाप केले. ही चाचणी क्लाईव्ह ग्रॅन्गर या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ञाने शोधून काढली असून ती संख्याशास्त्रातील एक गृहितक आहे. दोन घटकांतील परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही चाचणी वापरली जाते. या शोधातून प्रदूषणाची कुठली पातळी, मानवी उदासिनतेसाठी कारणीभूत ठरते, हे समजले नसले तरी शासनाने प्रदूषण रोखण्यासाठी राबविलेले धोरण नागरिकांच्या संतोषाला कारणीभूत ठरते हे स्पष्ट होते. स्वच्छ हवा माणसाला सुखकारक ठरते आणि त्यामुळे शासनांनी आपल्या विविध धोरणांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. चांगले शिक्षण धोरण राबविले, गरिबी उच्चाटनाची कास धरली आणि कामाच्या ठिकाणचा ताण कमी केला तर नागरिक समाधानाने जगताना आढळतात. हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेला पहिला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. तेल अविव येथील संशोधकांनी, हवेच्या प्रदूषणामुळे हृदयाच्या झटक्यासोबत दीर्घ काळ जडणाऱ्या हृदयरोगांचा आढावा घेतला आहे. प्रदूषित वातावरणात वास्तव्य असलेल्या लोकांना तुलनात्मकदृष्टय़ा हृदयविकाराचे वारंवार झटके येत राहतात. या अशुद्ध हवेने तसेच धूम्रपानातील धुराने रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते व त्या सुजतात. त्यातून हृदयाच्या विकारांना प्रारंभ होतो. तसा अशुद्ध हवा आणि हृदयविकार यातील संबंध याआधीच प्रस्थापित झाला होता, पण हा दुष्परिणाम नेमका किती प्रमाणात होतो, हे तेलअविवच्या वैज्ञानिकांना हुडकून काढायचे होते. त्यासाठी त्यांनी १९९२ आणि १९९३, इस्रायलमधील आठ विविध रूग्णालयात भरती झालेल्या ११२० रुग्णांची निवड केली होती. ते सारे जण मायोकार्डियल इन्फार्कशन या हृदयाच्या व्याधीने त्रस्त होते व त्यांचे वय ६५ वर्षांखालील होते. या रुग्णांचे १९ वर्षे (२०११ पर्यंत) सातत्याने तपासणी व निरीक्षण करण्यात आले. हे रुग्ण जिथे वस्ती करीत होते, त्या ठिकाणच्या हवेचा दर्जादेखील तपासला जात होता. तेव्हा, त्यांना आढळून आले की कमी प्रदूषणाच्या पर्यावरणापेक्षा जादा प्रदूषणात वावरणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका, मेंदूतील रक्तस्राव व हृदयक्रिया बंद होण्याचे प्रकार ४३ टक्के जास्त होते. तसेच असे रुग्ण पहिल्या हृदयाच्या झटक्यानंतर वीस वर्षांच्या आत दगावण्याची शक्यता ३५ टक्के जास्त होती.लॉस एंन्जल्समधील ‘हार्ट इन्स्टिटय़ूट ऑफ दी गुड समेरिटन हॉस्पिटल’ आणि सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी देखील वरील संशोधनास दुजोरा देणारे निष्कर्ष काढले आहेत. प्रदूषित हवेत सराव करणारे खेळाडू फुफ्फुसापेक्षा हृदयविकारांचे मोठय़ा प्रमाणात बळी ठरतात, असं त्यांच्या अभ्यासातून आढळले आहे.हवेतील प्रदूषके शरीरात सुपरऑक्सिडाईज्ड रेणूची वाढ करतात व ते शरीरपेशीचा विध्वंस करतात. त्यामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि त्याहीपेक्षा रक्तवाहिन्या व हृदयाला इजा पोहचते. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके रक्तवाहिन्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात. हवेच्या प्रदूषणासंबंधी जी काटेकोर प्रमाणे ठरविलेली आहेत, त्या प्रमाणातील प्रदूषकांमुळेसुद्धा शरीराला इजा पोहचते. हा या संशोधनातील धोक्याचा इशारा आहे. तसेच हृदयरोगी रुग्णांनी प्रदूषित वातावरणात सराव करू नये, अशी सूचना तिथले संशोधक देतात.पॅरिसमधील शास्त्रज्ञांनी तर त्याही पुढे जाऊन हवेतील प्रदूषकांच्या सान्निध्यात ७ दिवसांइतक्या अल्पावधीत वावरलेल्या लोकांची प्रकृती तपासली. हवेत असलेला ओझोन वायू, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फरडायोक्साईड आणि अडीच व १० मायक्रोमीटर व्यासाचे सूक्ष्म कण या प्रदूषकांनीयुक्त असलेल्या शहरी वातावरणात वावरणाऱ्या लोकांचा अभ्यास केला असताना, त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याने प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.शहरात हवेचे प्रदूषण भरमसाठ होत असते व तिथे वास्तव्य करणारे नागरिक हमखास उच्च रक्तदाबाचे बळी ठरतात. यावर जर्मनीतल्या संशोधनाने शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्प यातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबाच्या वाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा रक्तदाब पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. रक्ताचा वाढणारा दाब अॅथरोस्लेरोसिस या व्याधीचा प्रारंभ करतो व त्यातून रक्तवाहिन्या कठीण होत जातात. पुढे, त्याचा विपरीत परिणाम हृदयरोग बळावण्यात होतो. हृदयविकार आणखी बळावू नये म्हणून हृदयरोग्यांनी प्रदूषित हवेपासून दूर राहणे गरजेचे आहे असे वैज्ञानिकांना वाटते.हे सारे कमी म्हणून की काय, हवेचे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला बाधा आणते, त्यांना वैफल्यग्रस्त करते, असे ओहियो स्टेट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो, असे तिथल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात, तिथल्या संशोधकांनी मेंदूतील हिप्पोकॅम्पस या स्मरणशक्ती, शिकणे, भावावस्था यांच्याशी निगडित असलेल्या भागाचा सखोल अभ्यास करून सदर निष्कर्ष काढला. कॅनडातील कालगॅरी, टोरेन्टो आणि अल्बर्टा या शहरातील रूग्णालयात भरती केलेल्या ५१९१ रुग्णांची, तिथल्या युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी पाहणी केली. हे सारे प्रौढांमध्ये आढळणाऱ्या अपेन्डीसिटीस (आंत्रपुच्छाची वाढ) या व्याधीने ग्रस्त होते. १९ व्या आणि २० व्या शतकाच्या प्रारंभी औद्योगिक क्षेत्राची प्रचंड वाढ झाली आणि त्यानंतर विसाव्या शतकाच्या मध्यास ही वाढ रोखली गेली. वातावरणातील हवेचा दर्जा खालावत आहे व तो रोखण्यासाठी जी धोरणे अवलंबिली गेली त्याचा तो परिणाम होता. औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीच्या काळात, अपेन्डिसिटीसचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषात जास्त होते. कारण ते नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडत असतात. वातावरणातील ओझोन आणि नायट्रोजन ऑक्साईड वायूंचे वाढलेले प्रमाण या विकारास कारणीभूत ठरतात, असा तिथल्या संशोधकांचा दावा आहे. शहरी भागातील लोकांना सताविणारा हा विकार पुढे ग्रामीण भागात पसरत गेला, कारण औद्योगिकरणाच्या ऑक्टोपसने गावांना विळखा घालण्यास सुरुवात केली होती. प्रदूषणाचे संकट हे अदृश्य रूपातले असल्याने, सर्वसामान्यांना त्याचा नकळत फटका बसला असला तरी प्रत्यक्ष जाणवत नाही. यातूनच त्याचे फावते आहे, पण लक्षात कोण घेतो?