ठाणे : अवजड वाहनांचा भार, ठिकठिकाणी करण्यात आलेले वाहतुक बदल यामुळे मागील काही महिन्यांपासून ठाणेकर कोंडीच्या विळख्यात अडकले आहे. वाहतुक कोंडी झाल्यास शहरात अपघाताचे प्रमाण कमी होते असा तर्क पोलिसांचा असतो. परंतु जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे आयुक्ताल क्षेत्रात १३५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. १३५ पैकी २८ मृत्यू हे भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नारपोली भाग हा जिल्ह्यातील अपघाताचे केंद्र ठरत असल्याचे चित्र आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. या शहरातून पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा रोड, कर्जत-बदलापूर रोड आणि घोडबंदर असे महत्त्वाचे मार्ग जातात. या मार्गांवरून अवजड तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. शहरांतर्गत मार्गांचे जाळेही मोठ्याप्रमाणात आहे. मागील वर्षांमध्ये ठाणे पोलिसांनी विविध कारणांसाठी शहरात वाहतुक बदल केले आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत वाहतुकीस परवानगी आहे. असे असले तरी अनेकदा अवजड वाहनांची चोरटी वाहतुक शहरात होत असते. त्यामुळे वाहतुक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असतो. दररोज वाहतुक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. वाहतुक कोंडीमुळे वाहनांचा वेग कमी असतो. कोंडीच्या कालावधीत गंभीर अपघातांचे प्रमाण कमी होत असते, असा तर्क पोलिसांचा असतो. परंतु या ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत ५३५ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघांमध्ये १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१४ जणांना गंभीर दुखापत झाली असून १७४ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

आणखी वाचा-एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर

या अपघातांचे पोलीस ठाण्यानुसार नोंदणी पाहिली असता, भिवंडी शहरातील नारपोली भाग अपघाताचे केंद्र ठरू लागला आहे. भिवंडी शहरातून मुंबई नाशिक महामार्ग आणि जुना आग्रा रोड मार्ग जातात. भिवंडीत गोदामांमुळे अवजड वाहनांची वाहतुक होत असते. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदामांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असते असे येथील स्थानिक पोलीस सांगतात. नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ६१ अपघातांची नोंद झाली आहे. त्यापैकी २८ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर ४० जखमींची नोंद करण्यात आली आहे. भिवंडी पाठोपाठ डोंबिवली येथील मानपाडा क्षेत्रात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४२ अपघातांची नोंद झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जण जखमी झाले आहेत.

आणखी वाचा-कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी

शहरानुसार अपघातांचे प्रमाण

शहर मृत
ठाणे ते दिवा५२
भिवंडी ४६
डोंबिवली, कल्याण</td>२१
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर१६
एकूण १३५

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. -पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.