ठाणे : राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या मार्गाच्या रुंदीकरणाचे ६४ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. येत्या मे किंवा जूनच्या अखेरपर्यंत उर्वरित ३६ टक्के काम पूर्ण करणार असल्याचा दावा महामंडळाचे अधिकारी करत आहेत. असे असले तरी खारेगाव टोलनाका परिसरातील खारेगाव खाडी पुलाच्या रुंदीकरणाचे आव्हान रस्ते विकास महामंडळापुढे आहे. त्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण होईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांची वाहतुकही या मार्गावरून होत असते. महामार्गाचा दर्जा असतानाही या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता अंत्यत वाईट अवस्थेत आहे. काही भागात हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. तसेच महामार्गावर खाडी पुल देखील आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित आहे. परंतु प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडतात. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.

राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला समृद्धी महामार्ग देखील याच मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होणार आहे. या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. सप्टेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु पावसाळ्यात कामामध्ये येणारा अडथळा किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पाच्या पूर्णत्त्वाची अंतिम मुदत आता मे २०२५ करण्यात आली आहे. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत या प्रकल्पाचे काम ६४ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ३६ टक्के काम मे अखेरीस पूर्ण करण्याचे आव्हान एमएसआरडी समोर आहे. यातील खारेगाव आणि साकेत खाडी पूलाचे काम करणे आव्हानात्मक आहे. हे दोन्ही पूल ठाणे खाडीवरून गेले आहेत. त्यामुळे या पूलाचे काम करणे कठीण जाणार आहे. हे काम मे अखेरीस पूर्ण होते की कामास आणखी मुदत घ्यावी लागेल याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>बदलापुरात भाजपचा माजी नगरसेवक शिवसेनेत; वामन म्हात्रेंची खेळी, किसन कथोरेंना धक्का

असा आहे प्रकल्प

– जून २०२१ मध्ये या प्रकल्पाचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले. ठाणे (माजिवडा) ते वडपे असा २३.८०० किमीचा हा प्रकल्प आहे. यामध्ये साकेत पूल, खारेगाव पूल हे महत्त्वाचे खाडी पूल आहे. तर एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाचा सामावेश आहे. खारेगाव टोलनाका येथे टोलनाका उभा केला जाणार आहे.

प्रकल्पाचे काम ६४ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे कामही वेगात सुरू आहे. त्यामुळे उर्वरित कामे मे पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. – राम डोंगरे, उप-अभियंता, एमएसआरडीसी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 64 percent of the work of widening the mumbai nashik highway has been completed amy