लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात, अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात आणि वैभव कदम च्या आत्महत्येस जबाबदार कोण, असे प्रश्न राष्ट्र्वादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शनिवारी उपस्थित करत आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. बेछूट आरोप करण्याआधी या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हानही परांजपे यांनी आमदार आव्हाड यांना यावेळी दिले.

राष्ट्र्वादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तर, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले होते. त्याला राष्ट्र्वादीचे (अजित पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउतर दिले. सुरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, माजी गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली. तेव्हा जितेंद्र आव्हाड आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात, तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात, हे एकदा जाहीर करा. अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी, मी आपणांस ५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८ वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करु नका तरी आपल्या खूशमस्कऱ्यांचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलीसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करुन बालिशपणा दाखविलात आणि पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत याचे उत्तर द्या. वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण, या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे सांगत परांजपे यांनी आव्हाड यांना जाहीर आव्हान दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात रहातोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारु शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही परांजपे यांनी यावेळी आव्हाड यांना दिला.

आणखी वाचा-..म्हणून शरद पवार यांना बाजूला करायचे होते, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

अजित पवार हे नेहमीच खरे बोलतात

३० नोव्हेंबर व १ डिसेंबर असे दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रास्ताविक केले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी स्वागत अध्यक्षीय भाषण केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समारोपाच्या भाषणात बोलताना २००४, २०१७, २०२९, २२ जून २०२२, २ जुलै, १२ जुलै, १२ ऑगस्टपर्यतच्या पक्षातील घटनांची सविस्तर माहिती दिली. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वप्रथम माझ्या नेतृत्वाखाली ठाण्यात, बॅलॉर्ड इस्टेट आणि यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करण्यात आले होते. अजित पवार हे नेहमीच खरे बोलतात. यामुळे याबाबत अजितदादांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, असेही परांजपे यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand paranjapes public challenge to jitendra awhad is to answer three questions before making reckless accusations mrj