लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील एमआयडीसीत अलीकडेच एमआयडीसीकडूनच बांधण्यात आलेल्या डोंबिवली नागरी सहकारी बँक ते विको नाका, सुयोग हॉटेलपर्यंतच्या नवीन काँक्रीट रस्त्याचे मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी एमआयडीसीने खोदकाम सुरू केल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मलनिस्सारण वाहिन्यांची कामे अगोदर पूर्ण करून मग काँक्रीट रस्त्याचे काम एमआयडीसीने हाती घेणे आवश्यक होते, अशाप्रकारे नवीन रस्त्याचे खोदकाम करून जनतेच्या पैशाचा अपव्यय केला जात आहे, अशी टीका या भागातील नागरिक, प्रवाशांकडून केली जात आहे.

गेल्या चार महिन्यांपासून डोंबिवली नागरी सहकारी बँक (डीएनएस) ते विको नाका रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एमआयडीसीकडून सुरू होते. कल्याण-शिळफाटा रस्त्याला पर्यायी हा सेवा रस्ता गुळगुळीत काँक्रीटचा तयार करण्यात आल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत होते. विको नाका परिसरातील सुयोग हॉटेल, रिजन्सी अनंतम प्रवेशव्दार भागातील शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्ग उभारणीची कामे सुरू आहेत. या रस्त्यावर सतत वाहन कोंडी असते. त्यामुळे या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी बहुतांशी वाहन चालक डोंबिवली नागरी सहकारी बँक ते विको नाका भागात असलेल्या शिळफाटा रस्त्यालगतच्या सेवा रस्त्यावरून प्रवास करतात.

आणखी वाचा-दु र्गाडी किल्ला येथील जत्रोत्सवामुळे कल्याणमधील गोविंदवाडी वळण रस्ता वाहतुकीसाठी बंद

डीएनएस बँक ते विको नाका भागात मलनिस्सारण वाहिन्या एमआयडीसीला टाकायच्या होत्या तर त्यांनी काँक्रीट रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच हे काम का करून घेतले नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. अनेक नागरिकांनी याविषयी एमआयडीसी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकारी याविषयी गुपचिळी धरून आहेत.

काही महिन्यापूर्वी एमआयडीसीतील काँक्रीट रस्ते कामे एमएमआरडीएकडून पूर्ण झाल्यावर एमआयडीसीने जलवाहिन्या स्थलांतरीत करणे, मलवाहिन्या स्थलांतरीत करण्याची कामे हाती घेतली होती. त्यावेळी एमएमआरडीएने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याचे उत्तर एमआयडीसी अधिकारी नागरिकांना देत होते. विको नाका ते डीएनएस बँक सेवा रस्त्याचे काम चार महिने एमआयडीसीकडून सुरू होते. या कालावधीत एमआयडीसीने रस्त्याच्या कडेला मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे करणे गरजेचे होते, असे येथील रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे: ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्टयांचे वाटप, श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश

या सततच्या खोदाकामांमुळे रस्त्यांची वाताहत होते. त्याचबरोबर रस्त्यालगतच्या जलवाहिन्यांची सतत तडफोड होते. त्यामुळे जलवाहिन्यांना जमिनीखाली गळती लागून अनेक भागाला पाणी पुरवठा कमी दाबाने होतो, अशा एमआयडीतील नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात एमआयडीसी कार्यालयात संपर्क साधला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.