महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी उत्कृष्ट दर्जाची नोकरी करायची, त्यातून भरपूर प्रमाणात पैसा कमावायचा हे तरुणांचे स्वप्न असते. मात्र वाचनाची आवड असल्याने तरुणपणी एखादे ग्रंथालय स्थापन करावे, या ग्रंथालयात नियमित हजेरी लावून वाचकांना पुस्तके उपलब्ध करून द्यायची आणि ग्रंथालयाचा कारभार एखाद्या नोकरीसारखाच पेलायचा हे कौतुकास्पद असले तरी थोडे धाडसाचेच काम आहे. कल्याणमध्ये राहणारे विलास धारप हे गेली ३४ वर्षे रामबाग परिसरात वाचकांना आपल्या श्रीगणेश ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून देत आहेत. विलास धारप यांनी विज्ञान शाखेत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले असले तरी नोकरी करायची त्यांची इच्छा नव्हती. विद्यार्थीदशेत असताना वाचनाची प्रचंड आवड असल्याने विलास धारप व त्यांची आई त्या काळात चार ग्रंथालयाचे सभासद होते. त्यावेळी रामबाग परिसरात उत्तम ग्रंथसंग्रह असलेले वाचनालय नव्हते. त्यामुळे स्वत:ची वाचनाची आवड आणि रामबाग परिसरातील नागरिकांना वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विलास धारप यांनी १९८१ मध्ये श्रीगणेश ग्रंथालयाची स्थापना केली. ग्रंथालय हीच आपली नोकरी असे मानून गणेश ग्रंथालयाच्या माध्यमातून नागरिकांना येथे ग्रंथसेवा पुरवली जात आहे.

विलास धारप यांनी ग्रंथालयासाठी जागा विकत घेतली. ते एकटय़ाने ग्रंथालयाचा कारभार सांभाळतात. तरीही त्यांच्या ग्रंथालयात २५ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीन भाषांतील पुस्तकांचा संग्रह त्यांच्या ग्रंथालयात आहे. रामबाग परिसरात विविध भाषिक नागरिक राहतात. त्यामुळे ग्रंथालयात इंग्रजी पुस्तकांना मागणी जास्त आहे. ग्रंथालयातील एकूण ग्रंथसंग्रहात १२,३३१ एवढी इंग्रजी पुस्तके आहेत. ग्रंथालयाची जागा अतिशय लहान असली तरी पुस्तकांनी भरलेले हे ग्रंथालय परिसरातील नागरिकांची वाचनाची आवड जोपासण्यासाठी उत्तम माध्यम ठरत आहे. ग्रंथालयातच लहान जागेत पुस्तकांसाठी पोटमाळा करण्यात आलेला आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पुस्तकांची देवाण-घेवाण करण्यासाठी वाचक ग्रंथालयात गर्दी करतात. विलास धारप यांच्यासोबत काही सहकारी ग्रंथालयात काम करत असले तरी इतक्या मोठय़ा संख्येने असणाऱ्या पुस्तकांमधून वाचकांना पुस्तके त्वरित कशी मिळतील असा प्रश्न पडतो खरा. मात्र विलास धारप यांनी ग्रंथालयातील प्रत्येक पुस्तकाची क्रमांकानुसार नोंद केलेली आहे. केवळ पुस्तकावरच या क्रमांकाची नोंद नसते तर धारप यांच्याजवळ असलेल्या लॅपटॉपवर ते पुस्तकांची नोंद ठेवतात. पुस्तकाचे नाव, लेखक आणि पुस्तकाचा क्रमांक अशी नोंद यामध्ये करण्यात आली असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा पुस्तकांची नोंद असली तरी एखाद्या वाचकाने पुस्तकाची मागणी केली तर नोंदी न पाहता विलास धारप वाचकाला ते पुस्तक आहे की नाही याची माहिती देतात. वाचकांनी मागणी केलेल्या पुस्तकांच्या विषयानुसार विलास धारप वाचकांसमोर पुस्तकांचा संच ठेवतात. मराठी कादंबऱ्यांची मागणी केल्यास कादंबऱ्यांचा संच वाचकांसमोर ठेवला जातो. वाचक त्यांना हवे असलेले पुस्तक निवडतात. पुस्तक परीक्षण आणि वाचकांच्या आवडीचा कल पाहून दररोज ग्रंथालयात पुस्तकांची खरेदी होत असते. पुस्तकांसोबत ग्रंथालयात हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील ४०० मासिके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथालयात आलेले प्रत्येक नवीन पुस्तक विलास धारप स्वत: शिवतात आणि त्याला कव्हर घालतात.  पुस्तकांसाठी १२० रुपये मासिक वर्गणी असून ३०० रुपये अनामत रक्कम आकारली जाते. मासिकांसाठी वेगळी वर्गणी नसून पुस्तके आणि मासिकांसाठी एकच वर्गणी आकारली जाते. ग्रंथालयात सध्या ८०० सभासद आहेत. वाचकांकडून अधिक करून चरित्रे, आत्मचरित्रात्मक पुस्तकांना जास्त मागणी आहे. मात्र काळानुसार ग्रंथालयात तरुण वाचकांची संख्या कमी होत चालली आहे अशी खंत विलास धारप यांनी व्यक्त केली. लहान मुलांसाठी ग्रंथालयात बालसाहित्य आहे. कॉमिक्सचा खूप चांगला संग्रह ग्रंथालयात आहे, मात्र बालसाहित्याच्या वाचनासाठी लहान मुले ग्रंथालयात येत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

श्रीगणेश ग्रंथालय, निशांत इमारत, वैद्य जिमजवळ, रामबाग मुख्य रस्ता, कल्याण (प.)