डोंबिवली : ‘आम्हाला गोळ्या घालू नका. आम्हाला सोडा, असे आर्जव पर्यटक करत होते. झुकून असलेल्या पर्यटकांना, यात हिंदू, मुस्लीम कोण-कोण आहे, असा प्रश्न दहशतवाद्यांनी केला. त्यावर हिंदू म्हणून संजय लेले यांनी हात वर करताच त्यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. लेले यांच्यावर गोळी झाडताच ते कोसळले. अतुल मोने यांनीही हिंदू म्हणून हात वर केला, तर त्यांच्या पोटात गोळी झाडली. ते जागीच निपचित पडले’, असा हृद्रयद्रावक प्रसंग सांगताना अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का, ऋचा मोने यांना शोक अनावर झाला.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी हे तिघे ठार झाले. तेथील हृदयद्रावक प्रसंग सांगताना अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का यांचा बांध फुटला. या वेळी १२वीत शिक्षण घेत असलेली कन्या ऋचा मोने, अनुष्का यांचा भाऊ प्रसाद सोमण उपस्थित होते. डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीतील श्रीराम अचल सोसायटीत मोने कुटुंब राहतात.
‘पहलगाम येथील बेसरन टेकड्यांवर पर्यटनाचा आनंद घेत असताना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धावपळ होत असल्याचे दिसले. एके ठिकाणी गर्दी जमली होती. तेथे काही खेळ चालू असतील असे वाटले. काही क्षणांत दोन लष्करी वेशातील दहशतवादी (कपाळावर गोप्रन कॅमेरा) आम्ही उभे होतो त्याठिकाणी आले. त्यांनी घोळक्याने सर्व पर्यटकांना एकत्र येण्यास सांगितले. हल्ल्याचा अनुभव असलेल्या स्थानिक घोडेस्वारांना क्षणात दहशतवादी आले आहेत, याची जाणीव झाली आणि आता काही तरी भयंकर होईल असे त्यांना वाटले. पर्यटकांना घोडेस्वारांनी दहशतवाद्यांसमोर झुकण्यास सांगितले.
या प्रकाराचा कधी अनुभव नसल्याने हेमंत जोशी पर्यटक का झुकले आहेत, घोडेस्वार आपणास का झुकण्यास सांगतोय या विचाराने अस्वस्थ झाले. हेमंत जोशी यांनी धाडस करून दहशतवाद्यांना आपण काय करताय, असा प्रश्न केला. ‘आम्ही काही करत नाही. तुम्ही बसून राहा, ’असे बोलून दहशतवाद्यांनी हेमंत जोशी यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्या वेळी किंकाळ्या, आक्रोश, हुंदके सुरू झाले. आम्हाला गोळ्या घालू नका. आम्हाला सोडा, असे आर्जव पर्यटक करत होते. झुकून असलेल्या पर्यटकांना हिंदु कोण, मुसलमान कोण, असे प्रश्न दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्याचे अनुष्का यांनी सांगितले.
‘पीडितांना साहाय्य करा’
मृत पर्यटकांच्या घरातील कर्ते पुरुष दहशतवाद्यांनी मारले. प्रत्येक घरात मुले शिक्षण घेत आहेत. काही घरांत कमविता कोणी नाही. या गोष्टींचा विचार करून सरकारने मृत पर्यटकांच्या घरात शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलावा. त्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अनुष्का मोने यांनी केली.
‘दहशतवाद्यांना सर्वांसमोर ठेचा’ दहशतवाद्यांनी महिला, मुले यांना हात लावला नाही. त्यांनी घरातील कर्त्या पुरुषांना मारले. मोदींचा उल्लेख करत काश्मीरमध्ये आपण आतंक माजविला आहे, असे दहशतवादी पर्यटकांना सुनावत होते. सामान्य पर्यटकांनी कसली दहशत माजवली आहे. कोणाचा राग निष्पाप पर्यटकांवर कशासाठी. पर्यटनासाठी धर्म लागतो का, असे प्रश्न मोने कुटुंंबीयांनी केले. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारने पकडून त्यांना जनतेसमोर ठेचले पाहिजे. पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला पाहिजे, असे अनुष्का यांचे बंधु प्रसाद सोमण यांनी सांगितले.