ठाणे : खंडणी दिली नाही म्हणून खून करून फरार झालेल्या आरोपी भिवंडी शहर पोलीसांनी तब्बल २६ वर्षानंतर उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.भिवंडी शहर पोलीस ठाण्यात २९ मे १९९९ रोजी दाखल करण्यात आलेल्या खंडणीसाठी खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विनोदकुमार श्यामलाल गुप्ता (वय ४९ वर्षे) याला उत्तर प्रदेशातील सिध्दार्थनगर येथून अटक करण्यात आली आहे.
हा आरोपी गेली २६ वर्षे फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार दादासाहेब पाटील हे मागील वर्षभर सातत्याने प्रयत्नशील होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या मूळ गावी परतल्याचे समजल्यावर मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक २२ एप्रिल २०२५ रोजी उत्तर प्रदेशात रवाना झाले.
भवानीगंज पोलीस स्टेशन, सिध्दार्थनगर येथे एस.टी.एफ. गोरखपूर युनिटच्या मदतीने खात्री करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. आरोपीला ३ दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर ठाणे येथे आणण्यात आले आहे. गुन्हा काय होता? मयत जिगर महेंद्र मेहता यांच्या पॉवर लूम कारखान्यात काम करणारा आरोपी राजू मेहता उर्फ बिशनसिंग सावत, अटक आरोपी विनोदकुमार गुप्ता आणि कमलेश उपाध्याय यांनी संगनमत करून खंडणीसाठी अपहरण आणि खून करण्याचा कट रचला होता. २८ मे १९९९ रोजी रात्री कारखान्याची वीज तोडण्यात आली. मयत वीज दुरुस्तीसाठी आल्यावर त्यांना मारहाण करून इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले, सोन्याचे दागिने व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर गळा चिरून हत्या करून मृतदेह ठाकुरपाडा, सरवली येथील शेतात टाकण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी आरोपींनी जिगर मेहता यांच्या घरी फोन करून १० लाखांची खंडणी मागितली होती.