डोंंबिवली – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बेसरन टेकड्यांवर पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी डोंबिवलीत भाजपतर्फे पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘हिंदु जागो रे’चा गजर करण्यात आला. दहशतवादी प्रवृत्ती आता मुळापासून ठेचलीच पाहिजे, अशी जोरदार मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आधार गेला आहे. अशा निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करण्यास सुरूवात केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डोंबिवली विधानसभेचे स्थानिक आमदार तथा भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार माजी नगरसेवक राहुल दामले, प्रदेश नेते शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मीतेश पेणकर, ग्रामीण पदाधिकारी नंदु परब, बाळा परब, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठीचा कार्यक्रम डोंंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात करण्यात आला.
या कार्यक्रमात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गुरुवारी भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून डोंबिवली बंद आहे. त्यामुळे व्यापारी, विक्रेते अधिक संख्येने भाजपच्या हिंदु जागर कार्यक्रम सहभागी झाले होते. हिंदु हितासाठी आपण संघटित झालेच पाहिजे. हिंदुंच्या एकजुटीमध्येच आपले हित आहे, असा संदेश या निषेध कार्यक्रमातून भाजपकडून देण्यात आला. हिंंदु जागराची गाणी यावेळी सामुहिक पध्दतीने गाण्यात आली. भ्याड हल्ला निषेधाचे फलक प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या हातात होते.
दहशतवादी शक्तीचे उच्चाटन करा, पाकिस्तानला धडा शिकवा, अशीच आक्रमक मागणी भाजप कार्यकर्ते करत होते.या निषेध कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी नागरिकांना डोंबिवली बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले. नेहमीच सकाळपासून गजबजलेला गेलेला डोंबिवली पूर्व, पश्चिम बाजारपेठांचा परिसर बंदमुळे गुरुवारी सुनासुना आहे. डोंबिवली परिसरातील गावांकडून काही महिला डोंबिवली रेल्वे स्थानक भागात भाजीपाला विक्रीसाठी येतात. त्यांनीही बंदमुळे सुट्टी घेतली आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन रिक्षा काही प्रमाणात सुरू आहेत. शहरातील सर्व उत्सवी कार्यक्रम बंद आहेत. शहराच्या विविध भागात संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत. मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांंच्या घरी आप्तस्वकीय, परिचित यांची सांत्वनासाठी गर्दी आहे.