बदलापूर, वांगणी आणि कुडसावरे भागांत वनखात्याच्या जमिनीवरील अतिक्रमणे वन विभागाने हटवली. आठवडाभर सुरू असलेल्या या कारवाईत २२ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
बदलापूर पूर्व औद्योगिक क्षेत्रापासून काही अंतरावर बेकायदा बांधकामे उभारण्यात आली होती. वांगणी परिसरात वनखात्याची जमीन मोठय़ा प्रमाणावर आहे. या जमिनीवर चाळी बांधण्यात आलेल्या होत्या. ती हटवण्यासाठी बदलापूरचे वन क्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांनी तातडीने कारवाई होती घेतली.
कुडसावरे येथील बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली. या कारवाईने वांगणीत बेकायदा घरे आणि चाळी बांधणाऱ्यांना या भागांत भविष्यात थारा दिला जाणार नाही. यापुढेही वनविभागाच्या वतीने अशाच प्रकारची कारवाई हाती घेण्यात येईल, असे हिरवे यांनी सांगितले. कारवाईदरम्यान राज्य राखीव पोलीस दल आणि वनविभागाची एक तुकडी या भागात तैनात करण्यात आली होती.
अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि कुडसावरे परिसरातील वनखात्याच्या जमिनीवर सुमारे १२०० नवी आणि जुनी बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. येत्या काळात ती हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chawls demolished on forest land at vangani