लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : महायुतीमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही. महायुतीत जागावाटप हे समन्वयाने होत आहे. महायुती अधिक मजबूत आणि घट्ट होऊन निवडणुकीला सामोरे जात असून यंदाची निवडणुकीत आम्हीच जिंकणार आहोत, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. ठाणे आणि शिवसेना, ठाणे आणि महायुती, बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे गुरुशिष्याचे प्रेम असे समीकरण असलेल्या ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येताहेत, हे ठाणेकरांचं भाग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर नवरात्रोत्सव सुरू केला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला आहे. या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे हे सहभागी होतात. यंदाही ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका कामगार अशा सर्वच स्तरातील नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात केलली कामे तर, महायुतीने सव्वा दोन वर्षात केलेली कामे यांचे मुल्यमान नागरिकांनीच करायला हवे. तसेच मला विश्वास आहे की, आमच्या कामाची पोचवापती या महाराष्ट्राची जनता देईल आणि महायुतीच सरकार बहुमताने येईल, अशा दावाही त्यांनी केला.

आणखी वाचा-गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा

बाळासाहेब ठाकरे असताना सर्वजण मातोश्रीवर येत होते. पण, आता त्यांचा वारस असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री पदाकरीता नाव घेण्यासाठी दिल्लीच्या गलोगल्ली फिरत आहेत. अशी त्यांच्यावर केवीळवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बाळासाहेबांनी कधीच ज्या लोकांना उभे केले नाही. त्यांच्यासोबतही त्यांनी घरोबा केला आहे. तसेच ते लोक पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहे. परंतू शिवसेनेचा मूळ मतदार मात्र धनुष्यबानासोबत जोडला गेला आहे. हे लोकसभेच्या निवडणूकीच सिद्ध झालेले आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांना इज्जत नव्हती. शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. या राज्याचा विकास बंद होता. या राज्याचे प्रकल्प बंद केले होते. अशा आसुरांचा नि:पात देवीकडून होईल, अशी टीकाही त्यांनी केली. सावरकर आणि हिंदुत्व यांच्या बद्दल बोलण्याच अधिकार त्यांना नाही. कारण ज्या दिवशी त्यांनी आघाडी केली, काँग्रेसबरोबर घरोबा केला. त्याच दिवशी हिंदुत्वाचा धागा तुटला. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले. त्यामुळे ते काही बोलूच शकत नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.