बदलापूरः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एका नाल्यावर स्लॅब टाकल्याचे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादाच्या समोर आल्यानंतर लवादाने असे नाले खुलेच असायला हवेत, असे निरिक्षण आणखी एका प्रकरणात यापूर्वीच नोंदवल्याचे स्पष्ट केले होते. बदलापूर पश्चिमेतील उड्डाणपुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात अशाच प्रकारे खुद्द कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून स्लॅब टाकला जातो आहे. येथे भाजी मंडई उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र राष्ट्रीय हरित लवादाच्या निरिक्षणानंतर पालिकेचे हे बांधकामावरही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. बदलापुरातील नैसर्गिक नाल्यांवर आधीच संक्रात आली असून त्यामुळे नाल्यांची रूंदी घटल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे.

हेही वाचा >>> Badlapur : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत बदलापूर रेल्वे स्थानकापासून आणि शहरातील एकमेव उड्डाणपुलाच्या खालून शहरातील महत्वाचा नाला वाहतो. या नाल्याला शहरातील विविध नाले येऊन मिळतात. शहरातील हा सर्वात मोठा नाला पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतो. या नाल्याची रूंदी गेल्या काही वर्षात कमी झाल्याचे समोर आले आहे. नाल्याच्या किनारी अनेक गृहप्रकल्प उभे राहिले. काही ठिकाणी नाल्यात भर घालून मालकीच्या जागांचा विकास झाला. शहराच्या पश्चिमेला साईकृपा हॉस्पीटलसमोरून वाहणाऱ्या या नाल्यात सध्या बांधकामासाठी उभारलेले सिमेंट कॉंक्रिटचे खांब उभे आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी येथे नाल्यावर स्लॅब टाकून तो बंदिस्त करून त्यावर भाजी मंडई सुरू करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. लागलीच त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र सध्या हे काम बंद आहे.

हेही वाचा >>> ठाणे : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

बदलापूर पूर्वेतून टाहुली डोंगरातून आणि संपूर्ण शहरातून येणारे पावसाळी पाणी, सांडपाणी या नाल्यातून उल्हास नदीला मिळते. पावसाळ्यात नाला रौद्र रूप धारण करतो. मात्र याच नाल्यात सिमेंट कॉंक्रिटचे खांब टाकून नाला बंदीस्त केल्यास भविष्यात विविध प्रश्न उपस्थित होऊ शकतात. अशाच एका नाल्यावरील बांधकामाच्या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाने काही निरिक्षणे नोंदवली आहेत. नवी मुंबई महापालिकेतील ऐरोली येथे सेक्टर – १४ मध्ये एका खुल्या नाल्यावर स्लॅब टाकून बांधकाम करण्यास सुरुवात झाल्याची बाब निदर्शनास आणत हे बांधकाम जल कायदा आणि किनारा नियमन क्षेत्राच्या नियमात बसत नसल्याची तक्रार एका याचिकाकर्त्याने राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती. या याचिकेवरील सुनावणीत अशी बांधकामे पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक असल्याची निरिक्षणे लवादाने नोंदवली आहेत. अशाच एका प्रकरणात संबंधित प्रशासनाला नाला बंदिस्त करण्यासाठी करण्यात आलेले बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने सुनावणी पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकारानंतर बदलापुरातील नाल्यातील बांधकामही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

नेमकी निरिक्षणे काय

खुला नाला बंदिस्त करणे कायद्याने गुन्हा असून स्लॅब टाकणे म्हणजे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणे आहे. तसेच पावसाळ्यात वेगाने वाहणारे पाणी माती, झाड्यांच्या फांद्या तसेच मानवी कचरा वाहून नेते. मात्र पाणी ओसरताच हा कचरा आणि गाळ येथे जमा होतो. यामुळे पाणीही साचू शकते. त्याची स्वच्छता कशी करणार आणि त्याबाबत उपायोजना आहेत का, असे मत लवादाने नोंदवले आहे.

पालिकेचेच फलक आणि कचराही

कुळगाव बदलापूर नगरपालिकेने नाल्याशेजारी एक फलक लावून त्यात कचरा टाकू नये असे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र पालिकेच्या या बांधकामामुळे नात्यात पावसाळ्यात वाहून आलेला कचरा अडकलेला आहे. तो काढणार कसा असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.