डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव भागात उल्हास खाडी किनारची खारफुटी तोडून, या भागातील खाडीचे अंतर्गत प्रवाह बांधकामांचा टाकाऊ मलबा (डेब्रिज) टाकुन बुजविण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. खाडी किनाराचा मुख्य भाग आणि अंतर्गत प्रवाहांवर दिवसा सिमेंट, विटा, तुटलेल्या लाद्यांचा मलबा आणून टाकला जातो. त्यानंतर रात्रीच्या वेळेत हा मलबा जेसीबीच्या साहाय्याने सपाट करून त्यावर बेकायदा चाळी उभारण्याचे प्रकार भूमाफियांनी सुरू केले आहेत.
डोंबिवली पश्चिम खाडी किनारा भागात माणकोली उड्डाण पूल सुरू झाल्यापासून मोठागाव, रेतीबंदर, जुनी डोंबिवली, कोपरगाव भागातील जमिनींचे दर वाढले आहेत. या परिसरातून टिटवाळा, कल्याण परिसरातून येणारा पालिकेचा बाह्य वळण रस्ता जातो. भूमाफियांनी आपली वक्रदृष्टी कोपर गाव भागातील खाडी किनारच्या जमिनींवर वळवली आहे.
खाडी किनाराचा भाग मलबा, मातीचा भराव बुजवून टाकायचा आणि तेथे बेकायदा चाळी उभारायच्या, असा माफियांचा उद्योग आहे. भूमाफियांनी पालिका, महसूल, पोलीस यांना अंधारात ठेऊन कोपर गाव भागातील खाडी किनारा भराव टाकून बुजविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. भराव टाकताना अडथळा येणाऱ्या खारफुटी झाडांची कत्तल केली जाते.
डोंबिवली पश्चिमेत कोपरगाव, मोठागाव, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, देवीचापाडा हा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. या हरितपट्ट्यांमुळे विविध प्रकारची जैवविविधता या भागात पाहण्यास मिळते. स्थलांरित पक्षी या भागात येतात. हा एकमेव हरितपट्टा नष्ट झाला तर या भागातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होईल. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास नष्ट होतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. कोपर गाव भागात खाडी किनारी सुरू असलेली मलब्याची भरणी महसूल, पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ थांबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
कोपर गावमध्ये खाडी किनारा भागात यापूर्वी बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या चाळींमधील रहिवासी घर, परिसरातील कचरा खाडीत, खाडी किनारी फेकून देतात. त्यामुळे जलप्रदूषण होते. स्थानिक पातळीवर भूमाफियांची दहशत असल्याने त्यांच्या खाडी किनारा बुजविण्याच्या प्रकाराला कोणी रहिवासी, पर्यावरणप्रेमी विरोध करत नाहीत. डोंबिवली शहराच्या विविध भागातील रहिवासी दररोज खाडी किनारी फिरण्यासाठी येतात. हे रहिवासी खाडी किनारी खाडी बुजविण्याच्या भूमाफियांच्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात डोंबिवली विभागाचे ग्राम महसूल अधिकारी यांनी नाव छापण्याच्या अटीवर सांगितले, की ‘कोपर गाव येथे डेब्रिज टाकून खाडी किनारा बुजविण्याचा प्रकार सुरू असेल तर याप्रकरणाची माहिती काढून संबंधितांवर कारवाई केली जाईल.’ गेल्या वर्षी देवीचापाडा जेट्टी येथे खारफुटी तोडून खाडी किनारा बुजवून मातीचा भराव टाकण्याची कामे भूमाफियांनी सुरू केली होती. याप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी महसूल, वन आणि कांदळवन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल महसूल अधिकाऱ्यांनी घेऊन भराव टाकणाऱ्या अज्ञात माफियांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.