इतिहासप्रेमींकडून किल्ल्यावर साफसफाई
वसईचा किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडातून मोकळा करण्यासाठी चिमाजी अप्पांनी बांधलेला उत्तनजवळील धारावीचा किल्ला आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे. इतस्तत: पडलेला कचरा, वाढलेले रान, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, अतिक्रमणे यात हा किल्ला गुदमरून गेला होता. गड-किल्ले अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासप्रेमी मंडळींनी नुकतीच या किल्ल्यात साफसफाई मोहीम राबवली.
चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयात धारावी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसई किल्ल्याच्या अगदी समोर उत्तन येथील चौक परिसरात जंजिरे धारावी किल्ला आहे. चौक जेटीकडून वर गावाकडे जाताना हा किल्ला लागतो. सध्या झुडपांच्या गर्द रानात तो सहजासहजी नजरेत येत नाही. पोर्तुगीजांची समुद्रमार्गाने होणारी रसद तोडण्यासाठी चिमाजी अप्पांनी या किल्ल्याची बांधणी केली. हा टापू जिंकण्यासाठी चिमाजी अप्पांनी आठ वेळा प्रयत्न केला, नवव्या वेळी मात्र त्यांना यश मिळाले. ‘‘एका धारावीमुळे काय हालाहाल झाली, हे ईश्वरास ठाऊक’’ असे चिमाजी अप्पांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, त्यावरून हा किल्ला किती महत्त्वाचा होता याची सहज कल्पना येते, अशी माहिती किल्ल्यांचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दिली. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधल्याचे सांगितले जाते, परंतु हे सर्वस्वी चुकीचे असून किल्ल्याच्या बांधणीवरून तो मराठय़ांनीच बांधल्याचे सहज दिसून येते, असे राऊत म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा