लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी जोरदार हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील नाले गटार सफाई योग्य रीतीने न केल्याने पहिल्याच पावसात डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाला.

रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहन तळ, बाजारपेठ, परिसरातील दुकानांमध्ये रस्त्यावरील पाणी घुसले. पादचारी तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत इच्छित स्थळी जात होते. नालेसफाई शंभर टक्के झाली असल्याचा दावा करणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला पहिल्याच पावसाने उघड्यावर पाडले आहे.

आणखी वाचा-रानभाज्या बाजारात दाखल; जांभूळ, करवंदांसह, रानभाज्यामुळे आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार

लोकसभा निवडणुकीच्या काळात पालिका अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याने त्याचा गैरफायदा घेत नाले गटार सफाई करणाऱ्या ठेकेदारांनी उथळ कामे करून फक्त बिले काढण्याची कामे केली आहेत अशा तक्रारी वाढत आहेत. डोंबिवली रेल पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. परंतु आज संध्याकाळी हा परिसर जलमय झालेला होता. रेल्वे स्थानक परिसरातील गटारांमध्ये फेरीवाल्यांकडून कचरा टाकला जातो. आणि हा कचरा गटारात अडकल्यामुळे आणि तुंबत असल्याच्या तक्रारी आहेत. महात्मा फुले रोड, गरीबाचा वाडा भागात पाणी तुंबल्याच्या तक्रारी आहेत.