जीवनसत्त्वासाठी शेवग्याच्या शेंगा, पाने, फुलांचा वापर
पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण आदिवासी भागातील कुपोषण रोखण्याकरिता ‘शेवगा’चा आधार घेण्यात येणार आहे. शेवग्याच्या शेंगा, त्याची कोवळी पाने आणि फुलांमध्ये लोहयुक्त कॅल्शियम व इतर जीवनसत्त्वाचा भाग असल्याने अंगणवाडय़ाच्या अंगणात शेवग्याचे वृक्ष लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासन कुपोषणाची मात्रा कमी करण्यासाठी विविध उपRम राबवत असते. कुपोषणाने बालमृत्यू होऊ नये, तसेच रोजगारासाठी स्थलांतर होऊ नये यासाठी शासन रोजगाराचे जाळे पसरविण्याचे काम करीत आहे. अन्नधान्य, पौष्टिक आहार याचाही पुरवठा केला जातो. तरीसुद्धा कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘शेवगा’ हे झाड खूप उपयुक्त ठरत असून त्याची लागवड या वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात करण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
कुपोषित बालकांच्या रोजच्या आहारात शेवगा झाडाची पाने, फुले आणि शेंगा यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला तर यापासून लोहयुक्त कॅल्शिअम चांगल्या प्रकारे मिळते आणि ते कुपोषण घालविण्यासाठी गुणकारी ठरते, अशी माहिती नुकत्याच एका कार्यक्रमात बोरीकर यांनी दिली.
आरोग्य, दूषित पाणी, अज्ञान, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि पौष्टिक आहाराचा अभाव, किशोरवयीन मुली व गरोदर माता, स्तनदा माता यांच्या रोजच्या आहारात सकस अन्नपदार्थाचा अभाव ही कारणे कुपोषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्यावर मात करण्यासाठी ‘शेवगा’चा समावेश आहारात करण्यात येणार आहे. वाडा येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी गोरक्ष खोसे यांनीही जीवनसत्वयुक्त शेवगा हा कुपोषित बालकाचे कुपोषण दूर करण्यास फायदेशीर ठरेल असे सांगितले.
१० लाख वृक्ष लागवड
पालघर जिल्ह्यत शेवग्याची दहा लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ० ते सहा या वयोगटातील बालकांची कुपोषणाची संख्या कमी करता यावी यासाठी पालघर जिल्ह्यतील सर्व अंगणवाडी केंद्रांना शेवग्याचे रोप किंवा त्या शेवगा रोपाच्या बियांचे वाटप लवकरच केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.