कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेशीवरील सर्वाधिक वर्दळीचे शिळफाटा आणि मलंगरोड हे दोन्ही रस्ते जलमय झाले आहेत. या रस्त्यावर जागोजागी वाहने अडकून पडली आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फाची दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मलंगरोड बुधवारपासून पाण्याखाली गेला आहे.

कल्याण-शिळफाटा हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करताना या रस्त्यावरील चढउतार काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हा रस्ता समतल झाला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला मुसळधार पावसाचे पाणी तुंबले की हे पाणी थेट आता रस्त्यावर येत आहे. या रस्त्याचा काटई ते मानपाडा, काटई ते शिळफाटा दत्तमंदिर चौक भाग हा समतल आहे. त्यामुळे या भागात रात्रीपासून पाणी तुंबण्यास सुरूवात झाली. गुरुवारी सकाळी या रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेला. काटई ते कोळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. नेवाळी ते बदलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. काटईकडून बदलापूर, कर्जतकडे जाणारी वाहने जागोजागी अडकून पडली आहेत.

हेही वाचा…कल्याण-मुरबाड रस्ता जलमय

शिळफाटा रस्त्यावर पाणी आल्याने या रस्त्याच्या काटई ते खिडकाळी, मानपाडा भागातील अनेक दुकानांमुळे पुराचे पाणी शिरले आहे. फर्निचर, वाहनांची शोरूमना सर्वाधिक फटका बसला आहे. शिळफाटा जलमय झाल्याने सकाळी नवी मुंबई, मुंबई दिशेने निघालेला बहुतांशी नोकरदार वर्ग शिळफाट्यावरील पाणी पाहून या पुरात अडकायला नको म्हणून माघारी परतला. काही दुचाकी स्वार आव्हान स्वीकारून या पाण्यातून शिळफाटा दिशेने पोहचले.

ओला, उबर वाहन चालकांची वाहने या पुरात अनेक ठिकाणी अडकून पडली आहेत. दुकानदारांनी आपली मालवाहू, खासगी वाहने दुकानांसमोर सोडून दुकानातून निघून जाणे पसंत केले आहे. मलंगरोड भागातील आडिवली, ढोकळी, नांदिवली भागात बेसुमार बेकायदा बांधकामे झाली आहेत. या बांधकामांमुळे पुराचे पाणी वाहून जाण्यास मोकळी जागा उपलब्ध नसल्याने पुराचे पाणी मलंगरोडवर तुंबून राहत आहे. पुराचे पाणी आजूबाजूची वस्ती, दुकानांमध्ये शिरले आहे. त्यामुळे या भागातील बैठया चाळींमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे.

हेही वाचा…ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

आडिवली, ढोकळी, पिसवली भागातील बेकायदा बांधकामांमुळे मागील चार ते पाच वर्षापासून मलंगरोडला पुराच्या पाण्याचा तडाखा बसत आहे. यापूर्वी या भागातील पाणी नैसर्गिक नाले, ओढ्यांमधून वाहून जात होते. हे मार्ग बेकायदा बांधकामांनी बंद केले आहेत, असे स्थानिक रहिवासी सांगतात. ही बेकायदा बांधकामे करणारे बहुतांशी राजकीय पाठबळ असलेले भूमाफिया आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालय रस्ता, वंदे मातरम उद्यान भागात पाणी साचल्याने वाहन चालकांना वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते.