निवडणुकीच्या काळात आपण कसे प्रवाशांच्या हितासाठी झटत आहोत, असे भासवायचे आणि त्यानंतर प्रवाशांना त्रास देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रकार ठाण्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून होत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रेल्वे स्थानक परिसरात दौरा काढून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुजोर रिक्षाचालकांना कशी अद्दल घडवितो आणि प्रवाशांच्या हितासाठी पुढाकार घेतो, असे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गेल्या महिनाभरापासून ठाण्यातील रिक्षाचालक प्रवाशांना वेठीस धरत असतानाही शिंदे यांनी याकडे डोळेझाक केले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाचा देखावा करणारे हे नेते आता कुठे गेले, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या महिनाभरात दोन वेळा रिक्षा चालकांनी अघोषित संपाचे हत्यार उगारत ठाणेकर प्रवाशांची अक्षरश: छळवणूक केली. शहरातील वेगवेगळ्या रिक्षाचालक संघटनांना सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने मनाला वाटेल तेव्हा रिक्षाचालक रस्त्यावर उतरतात आणि प्रवाशांना वेठीस धरतात, असे दृश्य सातत्याने दिसत आहे. प्रवाशांना भाडे नाकारणे, अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, रिक्षांचे बॅच, परवाने नसणे, बोगस रिक्षा यांविरोधात ठाणे पोलीस आणि परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाई सुरू केली.
या कारवाईमुळे नियमांची तमा न बाळगत व्यवसाय करणाऱ्या अनेक रिक्षा चालकांचे धाबे दणाणले असून आपले आश्रयदाते असलेल्या नेत्यांकडे जाऊन ही कारवाई टाळता कशी येईल, यासाठी धावपळ सुरू झाली आहे. साधारण १५ दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतरही पोलीस दाद देत नसल्याचे पाहून बुधवारी सकाळी ठाण्यातील काही चालकांनी पुन्हा आंदोलन केले. ठाण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाने या दादागिरीला पाठिंबा दिल्याने या मुजोर रिक्षाचालकांना आणखी स्फूरण चढले. मात्र यामुळे सर्वसामान्य ठाणेकराचे हाल सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा