Eknath Shinde : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे. दोहोंनी विजयाचा दावा केला आहे. ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातल्या लोकांनी एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) कामांना किती गुण दिले आहेत? त्यांचं मतदार म्हणून म्हणणं काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ठाणेकर काय म्हणत आहेत तुम्हीच जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणेकर तरुण मतदारांनी नेमकं काय सांगितलं?

आमच्या मतदारसंघात केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) असा सामना आहे. आम्ही एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) कामांना १० पैकी १० मार्क्स देऊ असं काहींनी लोकसत्ताची प्रतिनिधी सिद्धी शिंदेंशी बोलताना सांगितलं. तसंच बेरोजगारीची सर्वात मोठी समस्या आहे हे ठाणेकरांनी सांगितलं. मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाहीत. तसंच घरांमध्ये पाणी गळतंय. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) मुख्यमंत्री झाले तरीही ते मतदारसंघात भेट देतात. आमच्या चाळींचं पुनर्वसन करुन आम्हाला चांगली घरं मिळावीत अशी आमची इच्छा आहे. गुन्हेगारी वाढली आहे ही इथली वस्तुस्थिती आहे कारण बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे चोऱ्यामाऱ्या वाढणारच. बेरोजगारीच्या समस्येवर उपाय म्हणून नोकऱ्या दिल्या गेल्या तर या गोष्टी कमी होतील असंही मत ठाणेकरांनी मांडलं आहे. बेरोजगारीचा मुद्दा प्रमुख आहे. बाकी वारसा तर सगळे जपतच आहेत. त्यात काही विशेष नाही. एकनाथ शिंदेंनी बंड केलं वगैरे त्यावर आमचं काही मत नाही असं या ठाणेकरांनी काय सांगितलं.

हे पण वाचा- शहरापेक्षा नागपूर ग्रामीणमध्ये चुरस अधिक, कुठे बंडखोरी, तर कुठे प्रस्थापितविरोधी लाट

ठाणेकर महिलांनी एकनाथ शिंदेंना किती मार्क्स दिले?

ठाणेकर महिलांशीही लोकसत्ताची प्रतिनिधी सिद्धी शिंदेंने संवाद साधला, तेव्हा या महिला म्हणाल्या आम्ही एकनाथ शिंदेंना १० पैकी १० गुण देऊ. कारण आमचा पाण्याचा प्रश्न एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) सोडवला आहे. रस्ते आणि गल्ली चांगल्या सोयी केल्या आहेत. योजनाही आमच्यापर्यंत पोहचत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसेही आम्हाला मिळाले. सगळ्याच बहिणी या सरकारच्या बाजूने उभ्या राहतील असं आम्हाला वाटतं. चाळी इमारतींमध्ये कन्व्हर्ट झाल्या तर खूप बरं होईल असं आम्हाला वाटतं. लोक आम्हाला चाळींवरुन नावं ठेवतात. अनेक वर्षांपासून ही मागणी आहे १५ ते २० वर्षे झाली आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग खुश आहे. आम्ही कर भरतो, श्रीमंतांकडून तेवढाच कर घेतला जातो, आमच्याकडूनही तेवढाच कर घेतला जातो. कररचना ही पगार किती कमी जास्त आहे त्यावरुन ठरवलं गेलं पाहिजे असं एका ठाणेकर तरुणीने सांगितलं. तसंच कुणाला काही झालं तर गरीबांसाठी चांगलं रुग्णालय असलं पाहिजे. खासगी रुग्णालयांची बिलं देणं आम्हाला परवडत नाही. तसंच सरकारी रुग्णालयं स्वच्छ नाहीत. आमच्यासाठी त्या सोयी केल्या पाहिजे असंही ठाणेकर तरुणीने सांगितलं. ठाण्यातली महत्त्वाची समस्या आहे ती रिक्षाची. आम्हाला रिक्षा मिळत नाही, रिक्षावाले असतात पण ते जायला नाही म्हणतात असंही या महिलांनी सांगितलं. इथल्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं पारडं जड आहे असं दिसतं आहे. फाटाफूट झाली त्याचं वाईटही वाटतं असंही काही महिलांनी लोकसत्ताला सांगितलं आहे. तसंच रिक्षावाल्यांची समस्या आहे असं महिलांनी म्हटलं आहे.

ठाणेकर रिक्षावाल्यांनी काय सांगितलं?

एकनाथ शिंदे यांची कामं खूप आहेत. केदार दिघे हे तसे नवखे आहेत असं रिक्षावाल्यांनी सांगितलं. तसंच आम्ही त्यांना १० पैकी १० गुण देऊ असं त्यांनी सांगितलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde or keadar dighe what thanekar said about the election scj