अंबरनाथः कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असतानाच अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या या मार्गात असलेले विद्युत खांब चार वर्षांनंतरही तसेच आहेत. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जातो आहे. तसेच या विद्युत खांबांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. या खांबांचा वापर करून अनेक वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्याचा योग्य वापर होत नसल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या चार शहरांना जोडणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. या रस्त्याच्या उभारणीत सुरूवातीपासूनच असंख्य अडथळे होते. जागेचा प्रश्न, शासकीय जागा आणि खासगी अतिक्रमणे, विद्युत खांब असे अनेक प्रश्न या रस्त्याच्या मार्गात होते. हळूहळू हे अडथळे दूर झाले. उल्हासनगरातील अतिक्रमणांचा प्रश्न मोठा होता. त्यांनंतर येथील विद्युत खांबही काढण्यात आले. त्यामुळे ज्या ज्या भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले त्या त्या भागात रस्त्याचा पूर्ण भाग वापरात आला. अंबरनाथ शहरात मात्र विद्युत खाबांचे अडथळे अजुनही जसेच्या तसे आहेत. काही महिन्यांपूर्वी येथील एका खासगी कंपनीच्या प्रवेशद्वारावरून वळण घेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचे दिसून आले होते. या ट्रकच्या चालकाचा यात भाजून मृत्यू झाला. त्यानंतर येथील कमी उंची असलेल्या विद्युत तारांना उंच करण्यात आले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण

हेही वाचा >>>भाईंदरच्या सहा गावांचा पर्यटन विकास कागदावरच; निधी उपलब्ध असूनही एमएमआरडीएचे अपयश 

मात्र याच रस्त्यावरील अनेक विद्युत खांब अजूनही जैसे थे आहेत. अंबरनाथ शहरातून बदलापूर कडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे विद्युत खांब अजुनही पहायला मिळतात. या खांबाचा आसरा घेऊन येथे बस, ट्रक उभ्या केल्या जातात. त्यामुळे तो रस्त्याचा भाग विनावापर पडून राहतो. तीन मार्गिका असलेला हा रस्ता बहुतांश अडतो. त्यामुळे येथे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्यातील विद्युत खांब हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी होते आहे.

निधीच्या उपलब्धतेअभावी या रस्त्याती विद्युत खांबांचे स्थलांतरण आणि इतर कामे मार्गी लावताना त्यात प्राधान्यक्रम ठरवण्यात आला. उपलब्ध निधीत आवश्यक कामे केली गेली. मात्र त्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष केले गेले. त्याच दुर्लक्षातून ट्रकला आग लागण्याची घटना घडल्याचा आरोप झाला. आता या विद्युत खांबांचे स्थलांतरण याचमुळे रखडल्याची चर्चा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electric poles on kalyan badlapur state highways make travel dangerous for motorists amy