ठाणे : मुंबईतील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील १६ बेकायदा जाहिरात फलक काढले. त्यानंतर महाकाय ५८ पैकी २० फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकले असताना फलकांचे सांगाडे कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या कापूरबावडी नाक्यावर सर्वाधिक महाकाय फलक तसेच कायम आहेत.

मुंबईतील घाटकोपर भागात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसेच ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त आकारांच्या जाहिरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बेकायदा जाहिरात फलकांच्या धोरणावर टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. ठाणे महापालिकेने शहरातील जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जाहिरात कंपन्यांनी २६० जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले. तसेच पालिका प्रशासनाने शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करून बेकायदा फलकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये आढळून आलेले शहरातील १४ बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली.

हेही वाचा – अंबरनाथ पालिका म्हणते वालधुनी नदी नव्हेच ! बांधकाम प्रकरणात स्पष्टोक्ती

याशिवाय, ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा ५८ फलक मोठ्या आकाराचे असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले होते. २० फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई केली. उर्वरित ३८ फलकांवरील पत्रे काढण्याची कारवाई सुरू आहे. असे असले तरी जाहिरात फलकांच्या सांगाड्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून हे सांगाडे अद्याप जागेवर असल्याचे दिसून येत आहे. हे सांगाडे कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून कापुरबावडी चौक ओळखला जातो. या चौकात अवजड तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते.

परिवहन उपक्रमांच्या बसचीही वाहतूक सुरू असते. या चौकालगतच एक भला मोठा जाहिरात फलक उभारण्यात आला आहे. हा फलक अधिकृत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असले तरी इतक्या मोठ्या आकाराचा फलक उभारण्यास परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकापेक्षा जास्त फलकांची परवानगी घेऊन त्याची एकत्रित उभारणी करता येते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खातरजमा करू

पालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठ्या असलेल्या ५८ पैकी २० फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई केली. उर्वरित ३८ फलकांवरील पत्रे काढण्याची कारवाई सुरू आहे. तसेच पत्रे काढलेल्या फलकासाठी उभारलेला सांगाड्यांचा भाग काढून टाकण्याच्या नोटिसा संबंधितांना देण्यात आल्या आहेत. १६ बेकायदा जाहिरात फलक काढून टाकण्यात आलेले आहेत. तसेच कापुरबावडी येथील जाहिरात फलकाचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले असून काही तक्रारी असतील तर त्याची पाहणी करून खातरजमा केली जाईल, असे पालिकेच्या जाहिरात विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली

उपाययोजनांचे काय?

गोल्डन डाइज नाका भागातील जाहिरात फलक उभारण्यात आला होता. या फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र संबंधित कंपनीने पालिकेकडे सादर केले होते. परंतु वाऱ्याच्या वेगाने हा फलक हेलकावे देत असल्याचे आढळून आले होते. त्या फलकावर पालिकेने कारवाई केली. आता उभ्या सांगाड्यांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी पालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.