ठाणे : सर्व महानगरात आणि मुंबईत कचऱ्याची समस्या आहे. फक्त आमच्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आणि नियोजन आम्ही केले आहे असे विधान वनमंत्री गणेश नाईक केले. ठाणे जिल्ह्याचा मी तीनवेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली मुख्यमंत्री कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी रात्री पार पडले. त्यांनतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ठाण्यातील कचरा समस्ये विषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सर्व महानगरात आणि मुंबईत कचऱ्याची समस्या आहे. फक्त आमच्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आणि नियोजन आम्ही केले आहे. ठाणे जिल्ह्याचा मी तीनवेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे नाईक म्हणाले.
अंधार हटवण्याकरीता आम्ही उजेड घेऊन आलो आहे. उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल. असेही ते म्हणाले. आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहीजेत असेही ते म्हणाले. जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही. तर जनसामान्य नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षातील मंत्र्यांनी अशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेचे प्रश्न सुटतील असेही ते म्हणाले.