प्रकल्पस्थळी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने गाड्या सोडल्याचा आरोप

ठाणे : येथील डायघर भागातील कचरा प्रकल्प ठेकेदाराने देयके मिळत नसल्यामुळे घंटागाड्या प्रवेशद्वारावरच रोखून धरल्याने गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील रस्त्यांवर घंटागाड्याच्या रांगा लागल्याने ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध दर्शविला. या प्रकारामुळे कळवा, दिवा आणि मुंब्रा भागातील कचरा संकलन ठप्प झाल्याने येथे रोगराईचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच प्रकल्पस्थळी अधिकाऱ्यांनी मारहाण करत जबरदस्तीने गाड्या सोडल्याचा आरोप करण्यात येत असून या वादानंतर ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात दंड थोपटल्याने शहरात कचराकोंडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रशासनाने मात्र दावा फेटाळून लावत शहरात कचरा संकलन ठप्प झाल्याने प्रकल्पस्थळी वाहने सोडल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> बदलापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला सामान्य रुग्णालयाचा दर्जा

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. राज्य शासनाने ठाणे महापालिकेला भिवंडीतील आतकोली भागात कचराभुमीसाठी नुकतीच जागा देऊ केली आहे. परंतु याआधी स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे महापालिका दिवा भागात आणि त्यानंतर भांडर्ली कचरा टाकत होती. परंतु नागरिकांच्या विरोधानंतर येथे कचरा टाकणे बंद करत पालिकेने डायघर येथे १४ वर्षानंतर कचराप्रकल्पाची उभारणी केली. याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मीती केली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले होते. गेल्या वर्षभरापासून येथे कचरा टाकण्यात येत आहे. परंतु याठिकाणी कचऱ्यावर कोणतीही प्रक्रीया करण्यात येत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांकडून प्रकल्पास विरोध होत आहे. त्यातच कामाचे देयक थकल्यामुळे ठेकेदाराने गेल्या दोन दिवसांपासून प्रकल्पास्थळी येणाऱ्या घंटागाड्या रोखून धरल्या होत्या. या वाहनांच्या रांगा परिसरातील रस्त्यांवर लागल्याने दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण झाले. तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांमधून काही वाहनांना माघारी पाठविल्या. तसेच प्रकल्पात कचऱ्यावर कोणतीही प्रक्रीया होत नसल्याचा आरोप करत प्रकल्पास विरोध दर्शविला होता. यामुळे कळवा, दिवा आणि मुंब्रा भागातील कचरा संकलन ठप्प झाल्याने येथे रोगराईचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी डायघर येथे जाऊन रोखून धरलेल्या घंटागाड्या प्रकल्पस्थळी सोडण्यास सुरूवात केली. परंतु यावेळी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. तसेच ग्रामस्थांनी प्रकल्पास कडाडून विरोध सूरू केल्याने डायघर प्रकल्प वर्षभरातच अडचणीत येऊन शहरात कचराकोंडीची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> एमएमआर क्षेत्रातील पर्यटन विकासासाठी ‘सप्तसूत्री’

मनसेची टिका

डायघर कचराप्रकल्पावरून मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी ठाणे महापालिकेवर टिका केली आहे. खरंच आपले ठाणे बदलतंय का, दिवा-शीळ विभाग ठाण्यातच येतो ना, हे प्रश्न विचाराचे कारण असे आहे की, आपण १८ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा २०२४ या मोहिमेचा शुभारंभ ठाण्यात पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे केला आणि यावेळी सर्वं उपस्थित ठाणेकरांसह आपण देखील ‘स्वच्छतेची प्रतिज्ञा’ घेतली. तसेच, ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत रोपांचे वाटपही केले. खरोखरच आपण घेतलेल्या या शपथेचा पालिकेचे अधिकारी पालन करत आहेत का, असा प्रश्न आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजमाध्यमांवरून विचारला आहे. गेल्या ४ दिवसांपासून दिवा विभागातील कचरा उचलला गेला नव्हता, शिळ विभागातील घंटागाड्या गायब आहेत. त्यामुळे दिव्यासहीत संपूर्ण दिवा-शीळ विभागात कचऱ्याचे साम्राज्य साठले आहे. यातच एक बातमी समजते आहे की डायघर येथील कचरा प्रकल्प चालविणाऱ्या ठेकेदारास पैसे दिले नाहीत म्हणून काम बंद आहे आणि तरीही पालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी तिथे जाऊन जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात कचऱ्याच्या गाड्या खाली करून कचऱ्याचा ढिग लावला आहे. वरून तिथल्या सफाई कामगारांना मारहाण केली. आता तुम्हीच सांगा या अधिकाऱ्यांचे आम्ही करायचे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रीया

डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मीती केली जाणार होती. परंतु येथे कचऱ्यावर कोणतीही प्रक्रीया केली जात नसल्याने त्याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रकल्पस्थळी येणारी वाहने रोखून धरल्याने त्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे दुर्गंधीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे काही वाहने माघारी पाठविली होती. जिल्हा प्रशासनाने पालिकेला ही जागा दिली असून यामुळे येथे कचरा टाकणे बंद केले नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा नेऊन टाकू असा इशारा ग्रामस्थांच्या समितीचे पदाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे.

डायघर कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी ठेकेदारांने वाहने रोखून धरल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात कचरा संकलन ठप्प झाले होते. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणाहून कचराभुमीवर नेण्यात येणारा कचराही नेणे शक्य होत नव्हते. यामुळे त्याठिकाणी जाऊन कचरा वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. यावेळी कोणालाही मारहाण करण्यात आलेली नाही. याठिकाणी जेसीबी, घंटागाडी ठेकेदारांची समजून काढण्यात आल्यानंतर त्यांनी पालिकेसोबत काम करण्याची तयारी दाखविली असून त्यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. मनीष जोशी उपायुक्त, ठाणे महापालिका