लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात शुक्रवारी सकाळपासून कचऱ्याचे ढीग दिसू लागले असून कचरा उचचला जात नसल्याची बाब समोर आली आहे. शहरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने तब्बल ७ महिने बिलाचे पैसे अदा केले नाही. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले असून संतप्त कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने ऑगस्ट महिन्यात शहरातील कचरा उचलण्यासाठी एका कंपनीची नेमणूक केली होती. मात्र ऑगस्ट महिन्यापासून ते आजतागायत या कंपनीला पालिकेने बिलाचे पैसे दिलेले नाही. त्यामुळे ठेकेदाराचे आर्थिक गणितही कोलमडल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधिक कंत्राटदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांनी वेतन दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतापलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी घंटागाडी न चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंबरनाथ शहरातील कचरा उचलला गेला नाही. याबाबत नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धावाधाव करत या कर्मचाऱ्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एखाद दोन महिन्याची बिले रखडल्यास पालिकेची बाजू समजून घेता येईल.
मात्र सहा महिने वेतन मिळाले नाही तर काम कसे करायचे असे सफाई कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. तर सहा महिने आर्थिक गरजा कशा भागवायच्या असा प्रश्न कंत्राटदाराने उपस्थित केला आहे. तब्बल ७ महिन्यांचं बिल रखडल्यामुळे कामगारांचे पगार, गाड्यांचा खर्च हे सगळे आता आवाक्याबाहेर गेल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. त्यामुळे आता अंबरनाथ पालिकेने नागरिकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असलेल्या कामांचे पैसे तरी वेळेवर द्यावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय. येत्या काही दिवसात कचऱ्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास शहरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होते आहे.