कल्याण : मुसळधार पावसामुळे उल्हास, काळू नद्यांना महापूर आला आहे. या नद्यांचे पाणी परिसरातील गाव हद्दीत शिरल्याने कल्याण-मुरबाड रस्ता अनेक गाव हद्दीत जलमय झाला आहे. या रस्त्यावरील कल्याण ते अहमदनगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नगरकडून भाजीपाला, दूध घेऊन येणारी मालवाहू वाहने जागोजागी अडकून पडली आहेत.

मुरबाड रस्त्यावरील किशोर गाव परिसरात पुराचे पाणी घुसले आहे. टोकावडे गावाजवळील हेदवली पूल पाण्याखाली गेल्याने गाव परिसराचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. मुरबाडी नदी दुथडी वाहत आहे. या नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा…ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

उल्हासनगर जवळील म्हारळ, कांबा भागात पुराचे पाणी शिरल्याने या भागातील मुरबाड रस्ता जलमय झाला आहे. वाहन चालक आव्हान स्वीकारून या पुराच्या पाण्यातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. मुरबाड-कल्याण मार्गावर एस. टी. महामंडळाच्या बस अनेक ठिकाणी खोळंबून राहिल्या आहेत.

हेही वाचा…४० फिरते दवाखाने मुरबाडच्या दुर्गम भागात पडून; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या जीपही वर्षभरापासून पडून

पहाटे तीन ते चार वाजता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला घेऊन दाखल झालेली मालवाहू वाहने परतीच्या वाटेवर कल्याण, मुरबाड परिसरात अडकून पडली आहेत. उल्हास आणि काळू नद्या टिटवाळा, बदलापूर, जांभूळ, मोहने भागात इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत.