बदलापूर: एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महिन्यातल्या सर्वात उष्ण तापमानाची नोंद सोमवारी झाली. विदर्भाच्या अकोल्यात जिथे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असताना ठाणे जिल्ह्यातल्या धसई येथे त्यानंतर सर्वाधिक ४३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्याखाली मुरबाड मध्ये ४३.५, अंबरनाथ येथे ४२.५ तर बदलापुरात ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे विदर्भात जाणवणारे तापमान ठाणे जिल्ह्यातली अनुभवास येत होते.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवली विदर्भात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असतानाच ठाणे जिल्ह्यातही विदर्भ सारखेच चटके जाणवत होते ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील धसई गावात सर्वाधिक ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे त्या खालोखाल मुरबाड शहरात ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पालघर जिल्ह्यातील मनोर येथे ४३.१ तर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ४३ अंश सेल्सिअस स्थापन नोंदवले गेले. त्यामुळे पालघर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात विदर्भ सारखे उन्हाची चटके जाणवत होते. उत्तरेतून येणारी उष्ण हवा यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होते आहे. मंगळवारी सर्वाधिक तापमान नोंदवले जाऊ शकते. त्यानंतर तापमानात काही अंशी घट जाणवेल, अशी माहिती अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

सोमवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती. सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्यात उचांकी तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यात जिल्ह्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद होते आहे. सोमवारी सुद्धा मुरबाडच्या धसई येथे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. मुरबाड शहरातही पारा ४३ अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. शेजारच्या बदलापूर अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांमध्ये ही तापमान ४२ अंश सेल्सिअस वर गेले होते. त्यामुळे बाहेर गरम हवा जाणवत होती. दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र होते. सायंकाळी सहा नंतरही वातावरणात उष्णता होती. तर ठाणे जिल्ह्यात रात्री आठ वाजताही सरासरी तापमान ३८ अंश सेल्सिअसवर होते. त्यामुळे सोमवार एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरला.

संपूर्ण कोकणात विदर्भाचा अनुभव

सोमवारी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या सर्वच कोकणातील जिल्ह्यात विदर्भाचा अनुभव येत होता. खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात सरासरी ४२-४३ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात ४१-४२, रायगड ४१-४२, तर रत्नागिरी जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस सरासरी तापमान नोंदवले गेले.

शहरनिहाय तापमान

मुंबई ३६.२

विरार ३८.५

नवी मुंबई ३९.८

ठाणे ४०.२

पनवेल ४०.७

पालघर ४१

खारघर ४१.५

मुंब्रा ४१.१

डोंबिवली व कल्याण ४१.९

उल्हासनगर व बदलापूर ४२

अंबरनाथ व पलावा ४२.५

कर्जत ४३

मनोर ४३.१

मुरबाड ४३.५

धसई ४३.९