डोंबिवली – येथील पूर्व भागातील नांदिवली पंचानंद भागातील डाॅन बाॅस्को शाळेमागील राधाई काॅम्पलेक्स बेकायदा इमारत पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने शक्तिमान कापकाम यंत्राच्या साहाय्याने गेल्या महिनाभराच्या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून भुईसपाट केली.

नांदिवली पंचानंद येथील रहिवासी जयेश म्हात्रे यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा भूमाफिया संजय विष्णू पाटील, सचिन विष्णू पाटील, राधाबाई विष्णू पाटील, सुरेश मारुती पाटील यांनी बेकायदा ताबा घेतला. दहशहतीचा अवलंब करून दिवा येथील श्री स्वस्तिक होम्सचे मयूर रवींद्र भगत यांच्या संगनमताने बेकायदा इमारतीची उभारणी केली होती. कल्याण डोंबिवली पालिका, मानपाडा पोलीस, शासनस्तरावर तक्रारी करूनही अधिकारी जमीन मालक जयेश म्हात्रे यांच्या तक्रारींची दखल घेत नव्हते.

भूमाफियांनी सात माळ्याची राधाई बेकायदा इमारत उभारून त्यामधील १३ सदनिका बनावट बांधकाम कागदपत्रे, दस्त नोंदणी करून घर खरेदीदारांना विकल्या होत्या. पालिकेकडून कारवाई होत नाही म्हणून जमीन मालक जयेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती महेश सोनक, न्या. कमल खाता यांनी या प्रकरणाची सर्व बाजू तपासून, जमीन मालक, विकासक यांचे म्हणणे ऐकून राधाई बेकायदा इमारत भुईसपाट करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. मुसळधार पाऊस सुरू असल्याने पालिकेला ऑगस्टमध्ये ही इमारत तोडण्यात अडथळे येत होते. अखेर ही इमारत तोडण्यास वाढीव मुदत देण्याची मागणी पालिकेने न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मान्य केली होती.

ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने, पोलीस अधिकारी गुंड, पोलीस पथकाच्या उपस्थितीत राधाई बेकायदा इमारत टप्प्याने शक्तिकाम यंत्राच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली. साहाय्यक आयुक्त जगताप यांनी यापूर्वी मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील एक बेकायदा इमारत जमीनदोस्त केली होती. राधाई इमारत भुईसपाट करण्यात आल्याने भूमाफियांना तडाखा बसला आहे.

हेही वाचा – मृत्यूशी झुंज अपयशी! माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी काळाच्या पडद्याआड

हेही वाचा – महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?

साई रेसिडेन्सी रडारवर

या बेकायदा इमारतीनंतर १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आयरे येथील साई रेसिडेन्सी ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई पालिकेच्या ग प्रभागाकडून केली जाणार आहे. या बेकायदा इमारती विरुद्ध उज्जवला पाटील यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही बेकायदा इमारत भीम राघो पाटील, कलावती तुकाराम पाटील, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, रंजिता पाटील, सुरेखा नाना पाटील आणि साई रेसिडेन्सी डेव्हलपर्स यांनी उभारली होती. तक्रारदार उज्जवला पाटील या पाटील कुटुंबीयांच्या स्नुषा आहेत. त्यांचे स्थावर मालमत्तेमधील हक्क देण्यास पाटील कुटुंबीयांनी नकार दिल्याने उज्जवला उच्च न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून साई रेसिडेन्सी इमारत बेकायदा असल्याचे स्पष्ट करून ती जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी स्वताहून न्यायालयाला आम्ही ३० सप्टेंबरपूर्वी ही इमारत खाली करून देत असल्याचे लिहून दिले आहे. यानंतर गोळवलीतील शुभारंंभ सभागृह तोडण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. प्रीती कुथे यांनी याप्रकरणी याचिका केली आहे.