अंबरनाथः महापारेषणच्या आनंदनगर उपकेंद्रातील तीनपैकी एका ५० मेगाव्हॅट ऍम्पियर रोहित्राची क्षमता १०० मेगाव्हॅट ऍम्पियर करण्याचे काम ११ मार्चपासून हाती घेण्यात आले होते. अखेर हे काम दोन दिवसच आधीच मंगळवारी रात्री पूर्ण करण्यात आले असून क्षमतावाढ केलेले रोहित्र यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजता या रोहित्रातून वीजपुरवठ्याला सुरुवात झाली. यामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या वीजपुरवठ्याला मोठा लाभ होणार आहे. याप्रसंगी महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा आणि महापारेषणचे मुख्य अभियंता महेश भागवत उपस्थित होते.

महापारेषणच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहराला तसेच औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची क्षमता वाढीसाठी काम हाती घेण्यात आले होते. विविध औद्योगिक संघटना, ग्राहक, महापारेषण आणि महावितरण यांच्या संयुक्त नियोजनातून हे काम सुरू करण्यात आले होते. या कामाच्या पहिल्याच दिवशी खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गदारोळ माजला होता.

काही भागात वीज गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. याच कालावधीत पडघा येथून वीज पुरवठा खंडीत झाल्याने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना फटका बसला होता. मात्र महापारेषणच्या वतीने हे काम अविरतपणे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे नियोजीत २० मार्चपूर्वी दोन दिवस आधीच हे काम पूर्ण झाले.

त्यामुळे बुधवारी दुपारी या १०० मेगाव्हॅट ऍम्पियर क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. काम पूर्ण होईपर्यंत महापारेषणच्या आनंदनगर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या आनंदनगर एमआयडीसीतील १३ एक्स्प्रेस फिडरवरील औद्योगिक ग्राहक तसेच उल्हासनगर उपविभाग ४ व ५, अंबरनाथ पुर्व आणि पश्चिम, बदलापूर पुर्व आणि पश्चिम अंतर्गत सर्व वीज ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल महावितरण आणि महापारेषणच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, उल्हासनगर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, बदलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आनंदा काटकर यांच्यासह महावितरण व महापारेषणचे अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.