कल्याण : लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशाच्या पाठीवर असलेले पिशवीचे ओझे आणि डोंबिवली ते मुंब्रा नवीन रेल्वे मार्गाला असलेली वळणे ही लोकलच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यू कारणीभूत आहेत, अशी माहिती कल्याण, डोंबिवली परिसरातून ३५ वर्षाहून अधिक काळ लोकल प्रवास करत असलेल्या अनुभवी प्रवाशांनी दिली.

यापूर्वीही प्रवासी कल्याण ते ठाणे अतिजलद लोकलने पारसिक बोगद्यातून प्रवास करत होते. त्यावेळीही लोकल प्रवासात गर्दी असायची. प्रवासी दरवाजाला लोंबकळत, दरवाजाच्या मधल्या आधार दांड्याला धरून प्रवास करायचे. त्यावेळी एवढे अपघात होत नव्हते, असे अनुभवी प्रवासी सांगतात. आता कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दिवा परिसराचे नागरीकरण झाले आहे. मुंबईला जाणारा नोकरदार वर्ग वाढला आहे. प्रत्येकाची कामावर वेळेत जाण्याची धडपड असते. लोकल वेळेवर नसतात. मिळेल ती लोकल पकडून जाण्यासाठीची धडपड प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असे जुने प्रवासी सांगतात.

हे ही वाचा…कल्याणमधील आंबिवलीतील सराईत गुन्हेगारांची न्यायालयाच्या आदेशावरून मोक्कामधून मुक्तता

यापूर्वीच्या कसारा, कर्जत, खोपोली भागातून येणाऱ्या अतिजलद लोकल प्रत्येक स्थानकावर वेळेत यायच्या. कल्याण, डोंबिवलीतील प्रवासी ५५ ते ६० मिनिटामध्ये सीएसएमटीला पोहचायचा. या लोकल आता १५ ते २० मिनिटे उशिराने धावतात. या लोकलने नियमित जाणारे प्रवासी इतर लोकलमधून प्रवास करतात.

वातानुकूलित लोकलचे महागडे तिकीट असल्याने मोजकेच प्रवासी तिकीट काढून किंवा पास काढून प्रवास करायचे. आता सामान्य लोकलचे तिकीट असलेला प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास आहे. प्रवाशाच्या पाठीवरील पिशवी प्रवासी दरवाजात लोंबकळत प्रवास करत असेल तर ही पिशवी डोंबिवली, कोपर ते मुंब्रा दरम्यानच्या रेल्वे मार्गातील एखादा खांबाला जोराने धडकून प्रवासी त्या पिशवीसह रेल्वे मार्गात पडतो. कोपर रेल्वे स्थानकानंतर मुंब्रा दिशेने धिमी, अति जलद लोकल जाताना वळणे वळणे (वक्री) घेत धावत असते. यावेळी लोकलच्या दरवाजात लोंबकळतअसलेल्या प्रवाशावर डब्यातील प्रवाशांचा जोराने रेटा येऊन तो रेल्वे मार्गात पडतो.

यापूर्वी डोंबिवली, कल्याण लोकल या कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांसाठी हक्काच्या लोकल होत्या. आता कल्याण लोकलमध्ये कोपर, डोंबिवलीचे प्रवासी कल्याण दिशेने उलट प्रवास करून पुन्हा मुंबईचा प्रवास सुरू करतात. डोंबिवली लोकलमध्ये मुंब्रा, दिवा येथील उलट दिशेे प्रवास करतात. कार्यालयात वेळेवर जाण्यासाठीची ओढ कर्मचाऱ्यांना जीवघेणा धोका देते. यापूर्वीच रेट्रोचे रेक ६० ते ७० किमी वेगाने धावायचे.आताचे सिमेन्स, बम्बार्डियाचे रेक ७० ते ८० किमी वेगाने धावतात. नवीन रेल्वे मार्गावर या रेकना वेग असल्याने लोंबकळत असलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो.

हे ही वाचा…ठाणे जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीचा संभ्रम कायम, दोन लाखाहून अधिक दुबार मतदार असल्याच्या तक्रारी

प्रवाशांची वाढती गर्दी, कामावर वेळेत पोहचण्याची धडपड यामुळे प्रवाशांचे लोकल प्रवासातील मृत्यू वाढत आहेत.

प्रथमेश कुलकर्णी प्रवासी.

उलट दिशेने बसून येणारे प्रवासी, स्थानिक प्रवाशांचा लोकलमध्ये बसणे, प्रवासाचा हक्का हिरावून घेतात. त्यामुळे प्रवासी मिळेल त्या लोकलने प्रवासासाठी धडपडत असतो. या उलटमार्गी प्रवाशांवर, दरवाजा अडवून बसणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलीस कारवाई करत नाहीत. त्याचा फटका लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. लता अरगडे
अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.