ठाणे : एखाद्या गुन्ह्यात आरोपीची शिक्षा कमी करण्यासाठी, जप्त केलेले साहित्य सोडविणे, गुन्ह्याची कलमे कमी करणे अशा विविध प्रकारे नागरिकांकडून लाचेची मागणी करण्यात आलेल्या २७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ही प्रकरणे १ जानेवारी २०२३ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे ठाणे शहर आणि मिरा भाईंदर आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल आहेत. लाचेच्या प्रकारांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे चित्र आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नाागिरी आणि सिंधुदूर्ग हा भाग येतो. लाच घेणे आणि देणे गुन्हा आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी दरवर्षी सरकारी पातळीवर विविध कार्यक्रम घेतले जात असतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जात असते. असे असले तरी काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचार्यांकडून लाच घेणे सुरूच असते. दरवर्षी ठाणे परिक्षेत्रात १०० किंवा त्याहून अधिक गुन्हे लाच आणि अपसंपदा प्रकरणाचे दाखल होत असतात.

हेही वाचा : ठाण्याची हवा समाधानकारक, हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत

सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक संबंध येणारा विभाग म्हणजे पोलीस दल. पोलीस ठाण्यात तक्रार देणे, पारपत्र किंवा चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येत असतात. परंतु गेल्याकाही वर्षांपासून पोलीस दलात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या परिक्षेत्रा १०३ लाचेची प्रकरणे समोर आली होती. यातील १५ प्रकरणे पोलीस विभागाशी संंबंधित असून याप्रकरणात २० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर, २०२४ या वर्षी १ जानेवारी ते २४ एप्रिल या कालावधीत ठाणे परिक्षेत्रात २५ गुन्हे दाखल असून यातील पाच प्रकरणे पोलिसांशी संबंधित आहेत. याप्रकरणात सात पोलिसांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : ठाणे: टेम्पोच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

परिक्षेत्र- पोलिसांवरील कारवाई

१) ठाणे शहर- ९

२) मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालय – ८
३) सिंधूदूर्ग पोलीस – ४

४) नवी मुंबई – ३
५) ठाणे ग्रामीण- २

६) रायगड – १
एकूण – २७

Story img Loader