ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रीया पार पडली असून यामध्ये जिल्ह्यात ५६.०५ टक्के इतके मतदान झाल्याचे समोर आले आहे. गेल्या निवडणुकीत ५२ टक्के इतके मतदान झाले होते. यामुळे या निवडणुकीत ४ टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक मतदान भिवंडी ग्रामीणमध्ये तर, सर्वात कमी मतदान अंबरनाथमध्ये झाले आहे. वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांची धाकधुक वाढली असून वाढीव मतदान कुणाच्या पथ्थ्यावर पडणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पुुर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पुर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मिरा-भाईंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या १८ विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा मतदार संघांचा समावेश आहे. या १८ मतदार संघामधून २४४ उमेदवार निवडणुक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रीया पार पडली असून जिल्ह्यातील उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झाले आहे. बुधवारी संपुर्ण जिल्ह्यात ५६.०५ टक्के इतके मतदान झाल्याचे समोर आले आहे. गेल्या निवडणुकीत ५२ टक्के इतके मतदान झाले होते. यामुळे या निवडणुकीत ४ टक्क्यांनी मतदान वाढले आहे.

ठाणे जिल्ह्यात पाच वर्षांपुर्वी म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत १८ विधानसभा मतदार संघात इतके टक्के मतदान झाले होते. ठाणे शहरात ५२.७७, कोपरी- पाचपाखाडी ४९.०२, ओवळा- माजिवडा ४३.०८, कळवा- मुंब्रा ५०.०८, मीरा- भाईंदर ४८.४१, ऐरोली ४२.५७, बेलापूर ४५.२३, डोंबिवली ४०.८२, कल्याण पश्चिम ४१.९१, कल्याण ग्रामीण ४६.०८, कल्याण पूर्व ४३.०७, भिवंडी पश्चिम ५०.३४, भिवंडी पूर्व ४७.०९, भिवंडी ग्रामीण ५९.७२, अंबरनाथ ४२.४६, उल्हासनगर ४६.९९, शहापूर ६५, मुरबाड ५८.५३ अशी मतदान टक्केवारी होती. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत भिवंडी ग्रामीणमध्ये ६९.०१ टक्के, शहापूरमध्ये ६८.३२ टक्के, भिवंडी पश्चिममध्ये ५४.०१ टक्के, भिवंडी पूर्व ४९.०२ टक्के, कल्याण पश्चिम ५४.७५ टक्के, मुरबाडमध्ये ६४.९२ टक्के, अंबरनाथमध्ये ४७.७५ टक्के, उल्हासनगरमध्ये ५४ टक्के, कल्याण पूर्वमध्ये ५८.५० टक्के, डोंबिवलीमध्ये ५६.१९ टक्के, कल्याण ग्रामीण ५७.८१ टक्के, मिरा भाईंदरमध्ये ५१.७६ टक्के, ओवळा माजिवडामध्ये ५२.२५ टक्के, कोपरी पाचपाखाडीमध्ये ५९.८५ टक्के, ठाणे शहरमध्ये ५९.०१ टक्के, मुंब्रा कळवामध्ये ५२.०१ टक्के, ऐरोलीमध्ये ५१.०५, बेलापूरमध्ये ५५.२४ टक्के इतके मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि मुरबाड या तीन मतदान संघामध्ये ६४ ते ६९ टक्के इतके मतदान झाले असून या तिन्ही मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तर, अंबरनाथ आणि भिवंडी पुर्व मतदार संघामध्ये ५० टक्केही मतदान झालेले नसून याठिकाणी सर्वात कमी मतदान झाले आहे. उर्वरित मतदार संघात मात्र ५० ते ६० टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सर्वच मतदार संघांमध्ये मतटक्का वाढल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा… Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाआधी महायुतीचे नेते देवदर्शनाला, रक्षा खडसे, श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीचरणी नतमस्तक

लोकसभेच्या तुलनेत काही ठिकाणी मतदान घटले

सहा महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघातील १८ विधानसभा मतदार संघात मतदान वाढले होते. भिवंडी ग्रामीण ७२.६६, शहापूर ७०.२६, भिवंडी पश्चिम ५५.१७, भिवंडी पूर्व ४९.८७, कल्याण पश्चिम ५२.९८, अंबरनाथ ४७.०७, उल्हासनगर ५१.१०, कल्याण पूर्व ५२.१९, डोंबिवली ५१.६७, कल्याण ग्रामीण ५१.०१, मुंब्रा कळवा ४८.७२, मीरा भाईंदर ४८.९५, ओवळा माजिवडा ५०.७२, कोपरी पाचपाखाडी ५६.२५, ठाणे ५९.५२, ऐरोली ४८.४७, बेलापूर ५१.५३ इतके टक्के मतदान झाले होते. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, मुरबाड मतदार संघात सर्वाधिक झाल्याचे दिसून येत असले तरी सहा महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district voter turnout increased by 4 percent compared to the last election asj