ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात अद्यापही पुर्ण क्षमतेने घरोघरी कचरा संकलन सुरू झालेले नसल्यामुळे गृहसंकुलांबाहेर कचऱ्याचे ढिग अद्यापही कायम असून त्याचबरोबर कचरा उचलला जात नसल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी कचरा टाकण्यास मनाई करत कचरामुक्त केलेल्या ठिकाणांसह इतर नवीन ठिकाणी कचरा टाकण्यात येत असून यामुळे शहरात कचरा टाकण्याची ठिकाणे वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचबरोबर कचऱ्याला आग लागून परिसरात धुर पसरत आहे. या त्रासामुळे शिंदेची शिवसेना आणि स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे येथे कचरा नेणे पालिकेने बंद केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून डायघर येथील कचरा प्रकल्पही बंद आहे. यामुळे पालिकेने भिवंडीतील आतकोली भागात राज्य शासनाने कचराभुमीसाठी दिलेल्या जागेवर कचरा नेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, प्रवास कालावधी वाढल्याने दैनंदिन कचरा संकलनाचे गणित बिघडले असून यामुळे गृहसंकुलांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. याशिवाय, रस्त्यावरही कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाले आहेत. शहरात कचऱ्याची समस्या कायम असल्यामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने काही महिन्यांपुर्वी विशेष मोहिम हाती घेतली होती. यात शहर स्वच्छ रहावे यासाठी काही उपाययोजना करण्यात येत होत्या. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने रस्त्याकडेला कचरा टाकण्यात येत असलेले ११५ ठिकाणे कचरा मुक्त केली होती. याठिकाणी पुन्हा कचरा पडणार नाही, याची खबरदारी महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून घेतली जात होती. या भागात कचरा टाकू नका अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे फलक लावले होते. याशिवाय, या परिसरात झाडांच्या कुंड्या ठेवून हा परिसर सुशोभित केला होता. परंतु गेल्या आठ दिवसांत शहरात कचरा समस्या निर्माण होताच, याठिकाणी पुन्हा कचरा टाकण्यास सुरूवात झाली आहे. याशिवाय, ज्याठिकाणी यापुर्वी कचरा टाकला जात नव्हता, अशा परिसरातही कचरा टाकला जात आहे. यामुळे शहर अस्वच्छ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शरद पवार गटाचे आंदोलन
ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या अद्यापही कायम असल्याने ठाणेकर हैराण झाले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर बुधवारी कचरा टाकून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू, असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी यावेळी प्रशासनाला दिला. महापालिकेत कित्येक वर्षापासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासने देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई व घाणीचे साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असा आरोपही देसाई यांनी केला आहे.