ठाणे : कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि जुना पुणे लिंक रस्त्याला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी उन्नत मार्गाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ६४२.९८ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या विठ्ठलवाडी ते कल्याण असा थेट मार्ग नसल्याने सुमारे ४० ते ६० मिनीटे खर्ची पडतात. या उन्नत मार्गामुळे हे अंतर पाच मिनिटांवर येणार आहे. या मार्गात दोन रेल्वे मार्ग ओलांडावे लागणार असून वालधुनी नदीला समांतर विठ्ठलवाडी ते कल्याण अहमदनगर राज्यमार्गापर्यंत या मार्गाची उभारणी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यमार्ग, महामार्ग एकमेकांना जोडले नसल्याने अनेकदा मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे इंधन, वेळ आणि श्रम खर्च होतात. कल्याण, उल्हासनगर ही शहरे एकमेकांना खेटून आहेत. मात्र भौगोलिक रचना, वालधुनी नदी आणि थेट मार्गांच्या अभावामुळे शहराची दोन टोक एकमेकांपासून दूर असल्यासारखी वाटतात. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विठ्ठलवाडी परिसर ते कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग यांना जोडण्यासाठी थेट मार्ग नसल्याने विठ्ठलवाडीतून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण अहमदनगर मार्गावर जाण्यासाठी एकतर कल्याण शहरातून प्रवास करावा लागतो. उल्हासनगर शहरातून कल्याण बदलापूर राज्यमार्ग ओलांडून वर्दळीच्या भागातून जावे लागते. नगर महामार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि जुना पुणे लिंक रस्ता एकमेकांना जोडलेला नाही. त्यामुळे येथे थेट उन्नत मार्ग उभारण्याची कल्पना स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने सविस्तर आराखडा तयार केला.

हेही वाचा : नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलीस सज्ज, अमली पदार्थ तस्करांवर नजर; वाहतुक पोलीस देखील कारवाई करणार

कल्याण ते कर्जत आणि कसारा असे दोन रेल्वे मार्ग, तीन महामार्ग जोडणारा हा रस्ता उभारण्यासाठी नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ६४२.९८ कोटी रूपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३८ हजार १६०चौरस मीटर जागेचे भूसंपादन आवश्यक असून, त्यापैकी २३ हजार ९५१चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूसंपादन झालेले आहे. उर्वरित क्षेत्रफळ हस्तांतरीत विकास अधिकार (TDR) च्या माध्यमातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत सुरू आहे. हा मार्ग झाल्यास आता लागणारा ४० ते ६० मिनिटांचा वेळ थेट पाच मिनिटांवर येणार आहे.

हेही वाचा : कल्याण लोकसभेची आता चिंता नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

असा असेल मार्ग

हा मार्ग विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळून सुरू होऊन कल्याण अहमदनगर मार्गावर पाम रिसॉर्ट येथे उतरेल. हा मार्ग एकूण १ किलोमीटर ६५४ मीटर इतक्या लांबीचा असून चार पदरी उन्नत असेल. पाम रेसॉर्ट ते कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणारी २४० मीटरची एक स्वतंत्र मार्गिका असेल. तर स्थानकाकडून उन्नत मार्गाकडे जाणारी ५२० मीटरची एक मार्गिका असेल. तसेच पाम रेसॉर्टकडून शहाडकडे जाणाऱ्या भवानी चौकापर्यंत आणि तिथून पाम रेसॉर्टकडे येणाऱ्या दुपदरी २२० मीटरच्या मार्गिका असतील. या मार्गातील कल्याण बदलापूर राज्यमार्गावर जगदिश दुग्धालय येथे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी २ पदरी ४८० मीटरचे दोन रॅम्प असतील. तर कल्याण पूर्वेतून विठ्ठलवाडी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी २२० मीटरचा दुपदरी मार्ग असेल. विठ्ठलवाडी स्थानकाकडून विठ्ठलवाडी स्मशानभूमीमार्गे कल्याणकडे जाण्यासाठी ४७५ मीरचा दोन मजली उन्नत मार्ग असेल. तर विठ्ठलवाडी स्मशानभूमीकडून विठ्ठलवाडी स्थानकाकडे उतरणारी एक मार्गिका असेल.

हेही वाचा : ठाणे : तरुणीची ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या

या कामामध्ये कल्याण मुरबाड रस्ता आणि पुणे लिंक रस्ता यावरील चार एक पदरी रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. वालधुनी नदीच्या परिसरातील १८ मीटर विकास आराखडा रस्त्याचे डांबरीकरण आणइ दोन रेल्वे मार्गिकांवरील जमिनीवरील रस्त्यांचे डांबरीकरणे केले जाणार आहे. वालधुनी नदीच्या बाजुने १ हजार ४९० मीटरची संरक्षक भिंतही बांधली जाणार आहे. सोबतच कल्याणातील भवानी चौक, कल्याण बदलापूर रस्त्यावरील जगदीश दुग्धालय आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरातील अशा तीन चौकांची सुधारणा केली जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane vitthalwadi to kalyan nagar road approved and rupees 642 crores sanctioned from mmrda css
Show comments