लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने त्याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या परिसराला दररोज २० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज असल्याची बाब भाजपचे आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी पालिका अधिकारी आणि गृहसंकुलांच्या रहिवाशांसोबत घेतलेल्या बैठकीत समोर आली. वाढीव पाण्यासाठी संबंधित विभागांकडे पालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. भविष्यात शहराची लोकसंख्येत मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात प्रतिदिन १११६ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाणी आराखड्यानुसार पालिकेने आतापासूनच वाढीव पाण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे. असे असले तरी शहरात सद्यस्थितीत दररोज होत असलेला ५८५ दशलक्षलीटर पाणी पुरवठाही पुरेसा पडत नसल्याने शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे.

आणखी वाचा-Thane crime news: उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून टपरी वाल्याची हत्या

नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहे. या भागातील वसाहतींमध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने त्याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या भागातील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आमदार केळकर यांनी गुरुवारी पालिका मुख्यालय एक बैठक घेतली. यावेळी पालिकेचे अधिकारी, घोडबंदर भागातील रहिवाशी उपस्थित होते. या बैठकीत घोडबंदर भागाला दररोज २० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज असून त्यासाठी स्टेमकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यावर स्टेम प्राधिकरणाकडून वाढिव पाणी लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. नागरिक घराच्या कर्जाचे हप्ते भरत असून त्याचबरोबर त्यांना पाण्याच्या टँकरसाठी पेैसे मोजावे लागत आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची असून त्यांनीच त्यांना पाणी मिळत नसेल तर ते उपलब्ध करून द्यायला हवे, असे मतही केळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

आणखी वाचा-बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अजामीनपात्र गुन्हे दाखल करा

ठाणे शहरातील बेकायदा शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु हे गुन्हे जामीनपात्र होते. यामुळे शाळा चालकांवर काहीच परिणाम झालेला नाही. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा शाळांवर कारवाई करायची असेल तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करायला हवेत. याबाबत पोलिस आयुक्त आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना तसा निर्णय घेण्याची सुचना केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inadequate water supply to ghodbunder area mrj
Show comments