ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून त्याआधारे सिग्नलच्या प्रतिक्षेत असलेल्या वाहनचालकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी पालिकेने जाळीचे आच्छादन टाकले आहे. त्यापाठोपाठ आता शहरातील २५ गर्दीच्या ठिकाणी पालिका प्रशासनाने विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने पाणपोई सुरू केल्या आहेत. ठाणे स्थानकातील सॅटीसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होते तर, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. या वातारणीय बदलांमुळे ओढावलेल्या परिणामांना तोंड देण्यासाठी सुसज्ज राहणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पालिकेकडून करण्यात येत आहे. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्यावर्षी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी पालिकेने उष्णता कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असलेल्या शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या तीन हात नाका चौकातील मार्गिकेवर प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन टाकले आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी पालिकेने हा प्रयोग केला आहे. त्यापाठोपाठ आता आता शहरातील २५ गर्दीच्या ठिकाणी पालिका प्रशासनाने विविध स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने पाणपोई सुरू केल्या आहेत.

या उपक्रमात महापालिकेसोबत येस चॅरिटेबल ट्रस्ट, जेव्हीएम चॅरिटेबल फाऊंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. ठाणे स्थानकातील सॅटीसच्या खाली असलेल्या पाणपोईच्या उद्घाटनाने या उपक्रमाची मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करणार आहेत. या पाणपोईच्या परिसरातील नागरिकांनी या पाणपोईंचे व्यवस्थापन योग्य होत असल्याकडे आणि स्वच्छता राखली जात असल्याकडे लक्ष ठेवावे. – मनिषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी, ठाणे महापालिका

पाणपोईची ठिकाणे

ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, एमआयडीसी-अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस बस थांबा, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन रोड, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर पोलीस चौकी-मुंब्रा, लोकमान्य डेपो, मध्यवर्ती कारागृहाच्या मागे- राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका, बाळकूम अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.