लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे सध्या सर्वसामान्यांसह या मार्गावर प्रवास करणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीही त्रासदायक ठरत असल्याची चर्चा असतानाच, शुक्रवारी या महामार्गाच्या पाहणीसाठी गेलेल्या मुख्यमंत्री यांच्या शासकीय वाहनांच्या ताफ्यातील वाहनांनाही या खड्ड्यांचा फटका बसला. महामार्गातुन भिवंडी शहराच्या दिशेने असलेल्या एका उड्डाणपूलीवरील खड्ड्यांच्या खाच-खळग्यांतून हेलकावे खात मार्गक्रमण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे विरोधकांनाही आयते खाद्य हाती लागले आहे.

हे खड्डे बुजविण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नोलॉजीचा वापर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. ठाणे नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा तसेच तळवली ते शहापूर या रस्त्यांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केली. या रस्त्यावरील वाहतुक कोंडी होण्याची कारणे तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात होणाऱ्या कामांची त्यांनी स्वत: उपस्थित राहून पाहणी केली. हे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा या मार्गावर वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसला. महापालिका, रस्ते विकास महामंडळ, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. महामार्गाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांचा ताफा भिवंडीच्या आतील रस्त्यांकडे वळला. भिवंडी तसेच आसपासचा परिसर खड्ड्यांमुळे शरपंजरी पडला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. याच भागातील एका उड्डाणपूलावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा गेला असता, त्यांनाही खड्ड्यांचा सामना करावा लागला.

आणखी वाचा-मर्द असता तर समोर आले असते, हल्ला करून पळून का गेले? ठाकरे गटाचे राजन विचारे यांची मनसेवर टीका

ऐरवी वायुवेगाने पुढे सरकरणारे या ताफ्यातील वाहने खड्ड्यांमधून मार्ग काढताना अरक्षरश: हेलकावे घेत होती. हे दृश्य गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून नागरिकांच्या त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहे. दररोज प्रवाशांना खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अवजड वाहनांमुळे कोंडीत अधिक भर पडत आहे. त्यामुळे कोंडीतून केव्हा सुटका मिळेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

आणखी वाचा-दिघेंची ‘ही’ वाघीण ठाकरे गटातून शिंदे गटात, धर्मवीर चित्रपटात गाजले होते पात्र

मुख्यमंत्र्यांचे आदेश काय?

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम साहित्य टिकत नाही. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड च्या अभियंत्यांनी शोध लावलेल्या “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फायबर आहे. यावरुन अवजड वाहनेसुध्दा जावू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन या महामार्गावरील मोठे मोठे पॅच भरुन काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ठाणे-नाशिक व नाशिक-ठाणे या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम या तंत्रज्ञानानेच करण्यात येणार आहे. ही पध्दत टिकावू आहे. त्यामुळे लोकांना प्रवासात खड्ड्यांचा त्रास होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.